साखरखान्याने पैसे थकवल्याने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच शेतक-यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली असून या पाच जणांमध्ये एका महिला शेतक-याचाही समावेश आहे. हे सर्वजण माढा तालुक्यातील उंदरगावचे राहणारे आहेत.हा प्रकार घडू लागताच तेथे असलेल्या पोलिसांनी त्वरीत हस्तक्षेप करून सर्व शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. पंढरपूर तालुक्यातील विजय साखर कारखान्याने शेतक-यांची ऊस बिलाची सुमारे २६ कोटींची रक्कम थकवली होती. यामुळे शेतकरी हतबल झाले होते. संतप्त शेतक-यांनी सोमवारी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी यातील चौघांना ताब्यात घेतले असून पाचवा शेतकरी पळून गेला आहे, विजय साखर कारखाना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशी संबंधित आहे. हा कारखाना खासगी तत्वावर उभारला असता लगेचच आजारी होऊन बंद पडला. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह इतर काही बँकांचीही कर्जे विजय साखर कारखान्याने थकविली आहेत.