पुराच्या पाण्याखाली गेलेल्या गावांचे नवीन जागेत पुनर्वसन करणार, अशी घोषणा महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरात बोलताना केली आहे. पूरग्रस्त ग्रामीण भागातील घरांसाठी अडीच लाख रुपये तर शहरातील घरांसाठी साडेतीन लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. पुराच्या पाण्याने पडलेली घरे बांधून देण्याबरोबरच सध्या संपूर्ण घर पडलेल्या कुटुंबांना 1 वर्षाकरिता दर महिन्याला 2 हजार याप्रमाणे 24 हजार रुपयांचे भाडे शासनामार्फत दिले जाईल. बचत गटातील महिलांनी बॅंकेकडून कर्ज काढून उभ्या केलेल्या व्यवसायाचे नुकसान झाले असेल त्याचे सर्वेक्षण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव या पूरग्रस्त गावाची पाहणी केली. निलेवाडी येथे पूरग्रस्त गावकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या अडीअडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. काळजी करु नका, शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. निलेवाडी गाव 100 टक्के पूरग्रस्त असून संपूर्ण गाव पाण्याखाली गेले होते. निलेवाडी गावकऱ्यांना सरकारी अथवा खासगी जागा गावकऱ्यांच्या सहकार्याने उपलब्ध करुन घेऊन त्यांना नविन ठिकाणी घरे बांधून दिली जातील, असे पालकमंत्री म्हणाले. निलेवाडी गावात महसूल अथवा गायरान जागा शोधून त्या ठिकाणी गावाचे पुनर्वसन केले जाईल. सरकारी जागा उपलब्ध न झाल्यास खासगी जागा उपलब्ध करुन घेण्याचेही प्रयत्न केले जातील, असंही पाटील म्हणाले.

पूरग्रस्तांना रोख स्वरुपात 5 हजार रुपये आणि चार महिने 20 किलो धान्य देण्यात येत असून कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 27 कोटी 47 लाख अनुदान दिल्याचे पाटील यांनी सांगितले. टप्या-टप्याने सर्व ती मदत उपलब्ध करुन दिली जात असून पाण्याखाली गेलेल्या शेतीसाठी 1 हेक्टरची पीक कर्ज माफी आणि ज्यांनी कर्ज घेतले नाही त्यांना उत्पन्नाच्या तिप्पट मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गोठा बांधण्यासाठी तीन हजार रुपयांची मदतही शासनाने जाहीर केली असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितले. पूरग्रस्तांसाठी जे-जे करावे लागेल ते निश्चितपणे केले जाईल. पुरामुळे पडलेली घरे बांधून देण्याबरोबरच बुडालेल्या शेतीसाठीही पीक कर्ज माफ, विद्यार्थांना मोफत पुस्तके देणे, मुलींना एसटी प्रवास मेाफत अशा सर्व बाबींवर शासनाने लक्ष केद्रींत केले आहे. निलेवाडी या गावासाठी वारणा नदीवर ऐतवडे -निलेवाडी असा पुल बांधण्यासाठी तात्काळ अंजदाजपत्रक तयार करण्याचे निर्देशही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. पुरामुळे खराब झालेल्या पूलांच्या उभारणीचे काम प्राधान्याने हाती घ्या. या प्रक्रियेसाठी तीन दिवसांचे टेंडर काढण्यास शासनाने मान्यता दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.