रत्नागिरी/चिपळूण : बुधवारी रात्रभर पडलेला पाऊस, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग आणि समुद्राला आलेली भरती, अशा तीन घटना एकाच कालावधीत घडल्यामुळे गुरुवारी चिपळूण शहर शब्दश: जलमय झाले. सुमारे १६ वर्षांपूर्वी, २६ जुलै २००५ घ्या महापुरापेक्षाही निसर्गाचा मोठा प्रकोप चिपळूणकर अनुभवत असून शहरातील बहुसंख्य इमारतींचे तळमजले पाण्यात बुडाले आहेत. काही ठिकाणी तर पहिल्या मजल्यावरही घरांमध्ये तीन ते चार फूट पाणी भरले आहे. एनडीआरएफच्या तुकड्या संध्याकाळी चिपळुणात पोचल्या आहेत. घरांमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरचीही मदत घेतली जात आहे. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत तालुक्यात तब्बल २०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने शहरातील अनेक भागात पाणी साचले असून अंतर्गत मार्ग बंद झाले आहेत.