करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी मागच्यावर्षी लॉकडाउन करण्यात आला. त्यावेळी राज्यातील शाळा देखील बंद झाल्या. आता हळूहळू शाळा उघडण्यास सुरुवात झाली आहे. आधी नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. सरकारने आता पाचवी ते आठवीचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होतील, राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील शाळांमध्ये इ.५ वी ते ८ वीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात मंजुरी दिली आहे. येत्या २७ जानेवारीपासून कोरोनासंबंधित सगळी खबरदारी घेऊन हे वर्ग उघडले जातील. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेत कुठलीही कसूर राहणार नाही, अशी खात्री पालकांना देते.@OfficeofUT pic.twitter.com/CQpKf9zCZN — Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) January 15, 2021 "मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील शाळांमध्ये इ.५ वी ते ८ वीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात मंजुरी दिली आहे. येत्या २७ जानेवारीपासून कोरोनासंबंधित सगळी खबरदारी घेऊन हे वर्ग उघडले जातील. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेत कुठलीही कसूर राहणार नाही, अशी खात्री पालकांना देते" असे राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. शिक्षण विभागाच्या बैठकीत वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शाळा सुरु करण्याच्या विषयासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मंजुरीने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा सुरु करताना करोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. शाळा बंद झाल्यापासून ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. शिशु, बालवर्गापासून ते उच्चशिक्षणाचे वर्ग ऑनलाइन होत आहेत. पण या ऑनलाइन शिक्षण पद्धतीला काही मर्यादा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता पूर्वीप्रमाणे शाळेत जाऊन शिकता येईल.