"कोणाच्या म्हणण्यानं राज ठाकरे काही करतील, असे ते व्यक्ती नाहीत. राज ठाकरेंना त्या त्या वेळची राजकीय परिस्थिती समजते. कोणत्या ठिकाणी पोकळी निर्माण झाली आहे हेदेखील त्यांना समजतं आणि ती कशी ती भरून काढायची यासंदर्भात त्यांच्याकडे एक योजना असते. जेव्हा शिवसेनेनं मराठी माणसासोबत हिंदुत्वाचा मुद्दा घेतला तेव्हाच ती मोठी झाली. मराठी माणूस हा प्राण आहे, हिंदुत्व आमचा श्वास आहे, असं जेव्हा ते म्हणाले तेव्हा ते एक राष्ट्रीय पक्ष झाले आणि त्यांना स्वीकारणारा वर्ग वाढला. राज ठाकरेंच्यादेखील हे लक्षात आलं की मराठी माणूस हा आपला केंद्रबिंदू असलाच पाहिजे. याला व्यापकता दिली नाही तर सध्याच्या परिस्थितीत आपली भूमिका मर्यादित होते. अनेक ठिकाणी भूमिकाही घेता येत नाहीत," असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आणखी वाचा- “जेव्हा कुणाला माहिती नव्हतं तेव्हा मुख्यमंत्री झालो, पण…”; फडणवीसांनी व्यक्त केली सल "राज ठाकरे हे माझे चांगले मित्र आहेत आणि अनेकदा कोणालाही न सांगताही आमची भेट झाली आहे. त्यांच्यासोबत संवाद साधायलाही चांगलं वाटतं. अनेकदा त्यांनी माझ्यावर टीका केली, मीदेखील त्यांच्यावर टीका केली. एकमेकांची आम्ही उणीधुणीही काढली आहेत. परंतु त्यांच्याकडे एक विचार असतो. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची एक वेगळा दृष्टीकोन असतो. ज्यावेळी ते हिंदुत्वाकडे येत आहेत हे माझ्या लक्षात आलं. त्यावेळी मी त्यांच्या मनात नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांची भेट घेतली," असं फडणवीस म्हणाले. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. "त्यावेळी मला त्यांच्या मनातील त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्यावरून हे समजलं की ते योग्य दिशेने चालले आहेत. ज्यावेळी आम्ही मनसेची सुरूवात केली त्यावेळी आम्ही भगवाच झेंडा तयार करणार होतो. परंतु काही लोकांनी मिश्र रंगाचा झेंडा तयार करण्याच्या सूचना केल्या. परंतु त्यावेळीच मी भगवा झेंडाही रजिस्टरही केला होता असं राज ठाकरे म्हणाले होते," अशी माहितीही त्यांनी दिली. आणखी वाचा- सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगच्या विषयावर देवेंद्र फडणवीस म्हणाले… "मराठी माणसाबद्दलचा आग्रह आम्हाला त्यांचा मान्य आहे. हिंदुत्वाचा विषयही मान्य आहे. फक्त एक गोष्ट आम्हाला मान्य होऊ शकत नाही ती म्हणजे परप्रांतीयांच्या संदर्भातील टोकाची भूमिका. सध्या ते व्यापक विचार करत आहेत. आम्ही एक राष्ट्रीय पक्ष आहोत. सर्वांना सोबत घेऊन चालायचं आहे. महाराष्ट्रात मराठी माणूस हा महत्त्वाचा आहेच आणि त्याला सोबतच घेऊन चालायचं आहे. पण जो गैर मराठी आहे त्याचा तिरस्कार करून राजकारण करता येणार नाही. यावर जोपर्यंत आमचे विचार जुळत नाही तोपर्यंत ही मैत्री राजकीयदृष्ट्या होणं शक्य नाही," असंही फडणवीस म्हणाले. "राज ठाकरेंसोबत जाण्याची अनेकदा इच्छा होती. परंतु त्या एका कारणामुळे आम्ही गेलो नाही. परप्रांतीयांनी मराठी माणसाच्या डोक्यावर बसावं असंही आमचं मत नाही. परंतु त्यांच्यासंदर्भातील टोकाची भूमिका आम्ही मान्य करू शकत नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.