“मध्यंतरी भाजपाकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. एक तर मोठे नेते आणि माजी मुख्यमंत्री राज्यपालांना जाऊन भेटले. त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची जाहीर मागणीही केली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या भाजपाच्या कारवाया सुरू होत्या हे उघड आहे. मध्यप्रदेशात जे घडलं, तसंच कर्नाटकात जे घडलं ते महाराष्ट्रात करायचा त्यांचा प्लॅन होता. परंतु आमदारांची फोडाफोड करूनही सत्तांतर होणार नाही. त्यांची गोळाबेरीज करून ११८ च्या जवळपास संख्या आहे. कर्नाटक मॉडेल महाराष्ट्रात चालणार नाही म्हणून इतर मार्गांचा वापर करण्यात आला,” असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

“सध्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत जर सरकारची पाडापाडी केली तर ते लोकांना आवडणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही असं काहीही करणार नसल्याचं स्पष्ट केलं. तसंच नारायण राणे जे काही बोलले ते त्यांचं वैयक्तीक मत होतं. त्याला अधिकृत मान्यता नव्हती. परंतु ती होती का नव्हती हे त्यांनाच माहित,” असंही चव्हाण म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या विषयांवर भाष्य केलं.

आमच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न

“आम्ही कौतुकासाठी काही करत नाही. आज करोनाशी लढण्याची महत्त्वाची महत्त्वाच्या तीन व्यक्ती आहे. या तिघांवर लक्ष केंद्रीत असणारच. काँग्रेस कुठे दिसत नाही हा आरोप चुकीचा आहे. आम्ही एकाच विचारानं काम करत आहोत. आमच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. संजय निरुपम जे बोलतात ते त्यांचं वैयक्तीक मत असू शकेल. ते सध्या कोणत्याही पदावर नाहीत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.