तीनशे वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक ठेव्याची वाताहत
छत्रपती शिवाजी महाराजांची लाडकी कन्या सखुबाई आणि जावई महादजी नाईक-निंबाळकर यांच्या माळशिरस येथील समाधिस्थळाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. उपेक्षेचे जिणे जगणाऱ्या या स्मारकांना अनेक ठिकाणी चिरा गेल्या आहेत. त्याचे दगड-विटा निखळले आहेत. भोवतीने काटेरी झुडपांचे जंगल वाढले आहे. बेवारस झालेल्या या वास्तूत सध्या पत्त्यांचे डाव आणि दारुडय़ांचे अड्डे भरत आहेत.
सखुबाई आणि महादजी यांच्या निधनानंतर सुमारे तीनशे वर्षांपूर्वी माळशिरस येथे ही स्मारके उभारण्यात आली. एखाद्या मंदिराप्रमाणे बांधलेल्या या स्मारकास नक्षीकाम केलेले शिखरही आहे. अनेक वर्षे अज्ञातात राहिलेल्या या दोन्ही समाधिस्थळांचा शोध पंढरपुरातील ज्येष्ठ इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख यांनी लावला. ‘सोलापूर जिल्ह्य़ाचा इतिहास’ (मराठा कालखंड) या ग्रंथात त्यांनी या समाधिस्थळांची माहितीही दिली. त्यांच्या या संशोधनानंतर या स्मारकांच्या दुरवस्थेबद्दल मोठी ओरड झाली. यावर शासनाने २०११-१२ साली या दोन्ही स्मारकांचा जीर्णोद्धार करण्याचे जाहीर केले. सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत २२ नोव्हेंबर २०११ रोजी ८० लाख रुपये खर्चाच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा प्रस्ताव तयार करून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला. या प्रस्तावात दोन्ही समाधिस्थळांच्या दुरुस्तीसह संरक्षक भिंत बांधणे, पाण्याची व्यवस्था करणे तसेच परिसरात यात्री निवास उभारणे या कामांचा समावेश होता; परंतु जिल्हा नियोजन समितीकडे दाखल झालेल्या या प्रस्तावावर आजतागायत कसलीही कार्यवाही झाली नाही.

’आता या इमारतीला तडे जाऊ लागले आहेत. दगडाचे चिरे नाहीसे झाले आहेत.
’माजलेल्या काटेरी बाभळींनी या वास्तूचा गळा आवळला आहे.
’भटकी कुत्री, पत्ते खेळणाऱ्यांचे अड्डे असे या स्मारकाचे सध्याचे वर्तमान आहे.
’बेवारस झालेली ही वास्तू रात्री-अपरात्री दारुडय़ांचे आश्रयस्थान बनली आहे.  

ऐतिहासिक वास्तू, स्मारके यांचे जतन करणे ही काळाची गरज असताना आम्ही दररोज नवनवे पुतळे आणि स्मारके उभी करीत चाललो आहोत, हा आमच्या गौरवशाली इतिहासाचा आणि इतिहासपुरुषांचा अवमान आहे. या स्मारकांचे जतन करीत तिथे इतिहास मांडला तर नवी पिढी आमच्या या जाज्वल्य गतकाळाशी जोडली जाईल.
– गोपाळराव देशमुख,
इतिहास संशोधक