भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे निधन अपघाती असल्याचा अहवाल सीबीआयने दिला असला तरी राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी त्याबद्दल शंका व्यक्त केली आहे. केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री नितीन गडकरी यांनी मुंडेंना मृत घोषित करण्याची घाई का केली, असा सवाल त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे नेवासे मतदारसंघातील उमेदवार शंकर गडाख यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी कुकाणा येथील सभेत पाटील यांनी सवाल उपस्थित केले. ते म्हणाले, मुंडे यांच्या गाडीला किरकोळ खरचटले होते. त्यांना इजाही झाली नव्हती. असे असताना त्यांचे निधन झाले. हा प्रकार संशयास्पद आहे. डॉक्टरांनी मुंडे यांना मृत घोषित करण्यापूर्वी गडकरी यांनी त्यांना मृत कसे घोषित केले, त्याबद्दल जनतेच्या भावना तीव्र आहेत. हा अपघात नव्हेतर घातपात असल्याचा संशय होता.