मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणजवळ असुर्डे येथे रविवारी एका खासगी बसला झालेल्या अपघातात ४ प्रवासी ठार तर २० जण जखमी झाले. त्यापैकी चारजणांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातग्रस्त बस मुंबईतील ‘साईपूजा’ ट्रॅव्हल्सची आहे.
ही बस घेऊन चालक सुनील टिकम हा वरळी येथून राजापूरकडे निघाला होता. रविवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील असुर्डे येथे धुक्याचा अंदाज न आल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी झाडावर जाऊन आदळली. ही धडक एवढी जोरदार होती की, या बसने दोन पलटय़ा खलल्या.
या अपघातात सुनील कांबळे (२७, रा. शिपोशी), सतेज केतकर (१७, रा. देवगड), महेंद्र तांबे (३०, रा. राजापूर) आणि एक अज्ञात इसम ठार झाले, तर जखमी झालेल्या दिलीप पाडाळे (५३, राजापूर), अनिल झीमण (२५, गोठणे), आत्माराम वारिक (६२, रा. पडेल) व प्रियांका केतकर (४५, रा. किरबेट) या प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी झालेल्या २० जणांना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघाताची नोंद सावर्डे पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.