किनवट तालुक्यात पैनगंगा नदीपात्रातील सुप्रसिध्द असलेल्या सहस्त्रकुंड धबधबा पाण्यासाठी आलेल्या तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथील आठ पर्यटकांपैकी चार पर्यटक वाहून गेल्याची घटना मंगळवार (दि.15) रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. वाहून गेलेल्या पर्यटकापैकी एकजणाचे प्राण वाचविण्यात यश मिळाले असून अन्य तिघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथून सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आठ पर्यटक एपी-09-एक्स-9027 क्रमांकाच्या इनोवा गाडीने आज सकाळी दहाच्या सुमारास सहस्रकुंड येथे आले. या ठिकाणचे निसर्ग पर्यटन आणि वाहते पाणी पाहुन सर्वांना वाहत्या पाण्याच्या धारेसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. यावेळी सर्वजण सेल्फी काढण्यासाठी पैनगंगेच्या नदी पात्रात उतरले. यावेळी अचानक नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढला. दरम्यान आठ पर्यटकांपैकी चार पर्यटक बाहेर पडण्यास यशस्वी झाले. परंतु, रफीयोद्दीन, अकरम, सोहेल व नदीम हे चौघेजण पाण्याच्या प्रवाहाससोबत वाहून गेले. यापैकी नदीम नावाच्या पर्यटकाने नदीपात्रातील एका दगडाला पकडून होते.

दरम्यान घटनेची माहिती इस्लापूर पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दत्ता चोकलवाड. गोविंद भदेवाड. सयाजी तोकलवाड, लक्ष्मण तोकलवाड यांनी पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या नदीमला बाहेर काढले. परंतु, रफोयोदीन, अक्रम व सोहेल या तिघांचा वृत्त लिहीपर्यंत शोध लागला नसल्याची माहिती ठाणेदार रामेश्वर कायंदे यांनी दिली.