जव्हारपासून सात किमी अंतरावर केळीचा पाडा (काळशेती) येथील धबधब्यावर फिरायला गेलेली पाच तरुण मुलं पाण्यात बुडाली. सेल्फी फोटो काढत असताना आधी 2 मुले पाण्यात पडली. त्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी इतर मुलांनी पाण्यता उडी मारली. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने यातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. हे सर्व जण जव्हार येथील अंबिका चौक भागातील रहिवासी आहेत. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून या घटनेमुळे जव्हार शहरात हळहळ व्यक्त होत आहे. जव्हार शहरात टाळेबंदी असल्यामुळे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. जव्हार शहरातील अंबिका चौक येथील १३ मुले काळमांडवी धबधब्यावर दुपारी पोहण्यासाठी गेली होती. हा धबधबा खूप मोठा व खोल दरीत असून येथे पावसाळ्यात खाली उतरण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यात तीन मोठे पाण्याचे डोह आहेत. त्यामुळे या मुलांना खोलीचा अंदाज न आल्याने या डोहात एकाच वेळी पाच मुले बुडाली. त्यानंतर त्यांचे मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले व पुढील योग्य त्या कारवाई करीता कुटीर हॉस्पिटल जव्हार येथे आणण्यात आले आहेत. निमेश नरेन्द्र पटेल वय 30 वर्षे, जय अतुल भोईर 21 वर्षे, प्रथमेश प्रकाश चव्हाण 18 वर्षे, देवेंद्र गंगाधर वाघ 24 वर्षे, देवेंद्र दत्तात्रय फलटंनकर 21 वर्षे अशी बुडालेल्या पाच जणांची नावे आहेत. त्यानंतर घटनास्थळी पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक पालघर विक्रांत देशमुख यांनी भेट दिली आहे.