ढोल ताशे, लेझीम, पोवाडय़ांच्या गजरात मुरुडजवळील पद्मदुर्ग किल्ल्याचा जागर सोहळा संपन्न झाला. मुरुड नगर परिषद आणि कोकणकडा मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याला राज्यातील विविध भागांतून आलेल्या दुर्गप्रेमींनी हजेरी लावली. दुर्लक्षित किल्ल्याच्या संवर्धनाकडे शासनाचे लक्ष वेधले जावे आणि वैभवशाली इतिहास लाभलेल्या किल्ल्यांची जनसामान्यांना ओळख व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. रविवारी सकाळी १० वाजता या सोहळ्याची सुरुवात झाली. जागराच्या सुरुवातीला उपस्थितांना पद्मदुर्गदर्शन व माहिती देण्यात आली. यानंतर नगराध्यक्षा स्मिता पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमापूजन आणि दुर्गपूजन करण्यात आले. यानंतर राज्यातील विविध भागांतील आलेल्या शाहिरांनी शिवमहिमा सांगणारे पोवाडे सादर केले. जागराच्या शेवटच्या सत्रात शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मावळ्यांच्या वेशात अनेक मावळे यात सहभागी झाले. शिवछत्रपतींच्या जयघोषाने या वेळी गडाचा परिसर दणाणून सोडला. ढोलताशे, नगारे, लेझीम यांच्या गजरात महाराजांना मानवंदना देण्यात आली. या वेळी मुरुड शहरप्रमुख व नगरसेवक प्रमोद भायदे, नगरसेविका दांडेकर, बाळा साखरकर यांच्या उपस्थित होते. त्यानंतर ज्ञानेश्वर काकडे पथकाने पारंपरिक देवीचा गोंधळ सादर केला. या वेळी गोंधळीच्या संबळ व ढोलकीच्या तालावर अनेक पर्यटकांनी दिवटय़ा घेऊन पारंपरिक नृत्य केले. व लोकशाहीर नितीन मिठाग्री यांच्या पथकाने पोवाडे व गीते सादर केली. शेवटी पद्मदुर्गाच्या तटबंदीवरून छत्रपती शिवाजी महाराजांची शाही पालखी मिरवणूक काढण्यात आली. स्वराज्याच्या मजबूत बांधणीत अरबी समुद्रातील आरमारी सत्ता काबीज करण्याच्या दृष्टीने छत्रपती शिवरायांनी पद्मदुर्ग या जलदुर्गाचे बांधकाम करवून घेतले. रायनाक भंडारी याच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा दुर्ग बांधला गेल्याचे इतिहासातील दाखल्यावरून समजते. या जलदुर्गामुळे छत्रपतींना जंजिऱ्यावर करडी नजर ठेवता आली. जंजिरा घेता आला नाही. हे शल्य असले तरी समुद्रात अशा प्रकारचा जलदुर्ग बांधण्याचं कौशल्य छत्रपतींनी दाखवून दिले. या किल्ल्याचे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. जे िहदवी स्वराज्यात शिवाजी महाराजांना उपयोगी पडले. पण दुर्दैवाने याकडे खूपच दुर्लक्ष झाले. ऐतिहासिक किल्ल्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी या वेळी करण्यात आली. जंजिरा किल्ल्याप्रमाणेच पद्मदुर्गच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, आणि किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी छोटी जेटी उभारावी. अशी आमची मागणी आहे. यासाठी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या माध्यमातून शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल. - स्मिता पाटील, नगराध्यक्षा मुरुड.