जिल्ह्याच्या काही भागात करोनाबाधितांच्या अंत्ययात्रेत नागरीक सहभागी होत असल्याने संसर्ग वाढल्याचे निदर्शनास आले आहे. यावर उपाय म्हणून यापुढे करोना बाधिताचा मृत्यू ज्या शहरात होईल, त्याच ठिकाणी अग्निसंस्कार करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.

जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा प्रशासनातर्फे तातडीने उपाययोजना करण्यात येत आहे. तथापि, अनेक जण उशिरा उपचारासाठी येत असल्याने त्यांचा जीव जात आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना करोनासदृश्य लक्षणे आढळून आल्यास विशेषत: ताप असल्यास, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्यांनी तातडीने नजिकच्या डॉक्टरांकडे जावून उपचार घ्यावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी जिल्हावासियांना केले आहे.

जिल्ह्य़ात करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील रुग्णांवर वेळेत चांगले उपचार मिळण्यासाठी सर्व सुविधायुक्त खासगी रुग्णालये, तसेच रेल्वेचे रुग्णालयही अधिग्रहीत करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी भीती न बाळगता कोविड रूग्णालयात तसेच कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी येण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यातील आयएमएचे सदस्य, युनानी, होमिओपॅथी डॉक्टर यांचेकडे येणाऱ्या रुग्णांना करोना  सदृश्य लक्षणे आढळल्यास रुग्णांस त्वरीत जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्याच्या सुचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात आढळून आलेल्या करोना बाधित रुग्णांपैकी ७० टक्के रूग्ण हे अमळनेर, भुसावळ आणि जळगाव शहरातील आहेत.

त्यामुळे आरोग्य यंत्रणेने या शहरातील नागरिकांच्या ट्रेसिंग आणि ट्रॅकिंगवर भर देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी ढाकणे यांनी दिले.

जळगावात २१८ रूग्ण करोनामुक्त

जळगाव जिल्ह्य़ात गुरूवारी दुपापर्यंत करोना बाधितांची संख्या ५२८ पर्यंत पोहचली असून त्यापैकी २१८ रूग्ण करोनामुक्त होऊन घरी परत गेले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. जिाधितांची संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही चांगले आहे. गुरूवारी दुपापर्यंत जळगाव, जामनेर, पहूर, रावेर येथील २२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १७ नकारात्मक, तर पाच अहवाल सकारात्मक आले. सकारात्मक अहवाल असलेल्या व्यक्तिंमध्ये पहूर येथील दोन, जळगाव, जामनेर आणि रावेर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.