पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड गावातील २०० घरे पाण्याखाली आली आहेत. मुसळधार पावसासह धरणाचे पाणी सोडल्याने या परिसरातील १५० गावांचा संपर्क तुटला असून गडचिरोली जिल्ह्यातील नऊ मार्ग बंद झाले आहेत. भामरागड-आलापल्ली मार्ग बंद झाला आहे. यावर्षी सलग दुसऱ्यांदा हा मार्ग बंद झाला असून, पुराचे पाणी भामरागड गावात शिरले आहे. पर्लकोटा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. भामरागड गावातील किमान २०० घरे पुराच्या पाण्याखाली आली आहेत. सिरोंचा तालुक्यातील अट्टीवागू नाल्यावरील पूल वाहून गेल्याने त्या परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती नदीला पूर आल्याने दक्षिण गडचिरोलीतील आलापल्ली-भामरागड, असरअल्ली-सोमनपल्ली, कसनसूर-भामरागड-कवंडे, रोमपल्ली-झिंगानूर, हेमलकसा-सूरजागड, वैरागड-रांगी, कुरखेडा-वैरागड, कुरखेडा-पुराडा, पुराडा-धानोरा मार्ग बंद झाले आहेत. तसेच अनेक छोट्या नाल्यांवरून पाणी वाहत असल्याने छोटी गावे देखील संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत.