गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा धुडगूस सुरुच असून एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांनी १५ वाहने जाळल्याची घटना घडली आहे. यात जेसीबी आणि ट्रकचा समावेश असून रस्त्याच्या कामासाठी काही मजूर जेसीबी आणि ट्रकसह तिथे आले होते.

एटापल्ली तालुक्यातील गट्टेपल्ली येथील हालवेरा येथे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम आहे. यासाठी ट्रक, जेसीबी हालवेरात आणण्यात आले होते. तिथे काही मजूरही उपस्थित होते. शुक्रवारी रात्री उशिरा नक्षलवादी हालवेरात रस्त्याचे दुरुस्तीकाम सुरु असलेल्या पोहोचले. नक्षलवाद्यांनी आधी मजुरांना बंदुकीचा धाक दाखवत बाजूला नेले. यानंतर त्यांनी कामासाठी आणलेल्या वाहनांना पेटवले. यात एकूण ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.