गडचिरोलीमध्ये खोब्रामेंढाच्या जंगलात दंडकारण्य स्पेशल झोनल समिती सदस्य तथा नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागीय समितीचा सचिव भास्कर हिचामी याच्यासह पाच जण शहीद झाले. त्यांचे स्मरण व सन्मानार्थ सोमवार १२ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्हा बंदची हाक नक्षलवाद्यांकडून देण्यात आली आहे. १२ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन ‘भारत की कम्युनिस्ट पार्टी’ पश्चिम सब झोनल प्रवक्ता श्रीनिवास याने केले आहे.

विशेष म्हणजे या बंद दरम्यान आवश्यक सेवा बंदपासून मुक्त राहतील, करोना नियमाचे पालन करा, करोना वॉरियरच्या माध्यमातून पोलिसांना जंगलात गस्त करणे तात्काळ बंद करा असेही श्रीनिवास याने म्हटले आहे.

श्रीनिवास याने, “गडचिरोली पोलिस जंगलात सतत गस्त आणि नक्षलविरोधी अभियान राबवत आहे. एकीकडे देशात महाराष्ट्र राज्य करोनात क्रमांक एकवर आहे. करोना महामारीमुळे राज्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. त्यात पोलिस दलात करोनामुळे मृत्यूदर देशात क्रमांक एकवर आहे. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे करोनापेक्षा नक्षलवादी अधिक धोकादायक आहे असे म्हणून राज्यातील जनतेला भडकवत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अशा अमानवीय पध्दतीने वागणे योग्य नाही. तेव्हा गडचिरोली जिल्हा बंद यशस्वी करून दाखवायचा आहे, असे गडचिरोलीत वितरीत केलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच, “इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्समध्ये जीपीएस ठेवून पोलिस खबऱ्यांच्या माध्यमातून पाठवित आहे. तेव्हा नक्षलवादी सहकाऱ्यांनी सावध असणे आवश्यक आहे. खोब्रामेंडा जंगलात सी-६० पथकाने नक्षलवाद्यांना अशाच पध्दतीने घेरले होते. तेव्हा आता सतर्क राहणे आवश्यक आहे. क्रांतीकारी भास्कर हिचामी, सुखदेव नैताम, अमर उंडामी, सुजाता आत्राम व अस्मिता पद्दा तथा बस्तर विभागात मारल्या गेलेल्या सहकाऱ्यांच्या सन्मानार्थ हा बंद ठेवण्यात आला आहे. तेव्हा गडचिरोली जिल्हा बंद यशस्वी करा” असे आवाहन श्रीनिवास याने केले आहे.