गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांनी तीन ग्रामस्थांची हत्या केली आहे. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून ही हत्या करण्यात आली असून कोसफुंडी फाट्याजवळ ही घटना घडली आहे.
सोमवारी रात्री छत्तीसगडमधील सुमारे १५० दहशतवादी गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कोसफुंडी फाट्याजवळील कसनासूर गावात गेले. त्यांनी ग्रामस्थांना शस्त्रांचा धाक दाखवून गावाबाहेर काढले. यानंतर त्यांनी पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून तीन ग्रामस्थांची निर्घृणपणे हत्या केली. मालू दोगे मडावी, कन्ना रैनू मडावी आणि लालसू मासा कुडयेटी अशी या ग्रामस्थांची नावे आहेत. हत्येनंतर नक्षलवाद्यांनी गावात बॅनरही लावले. या बॅनरवर म्हटले आहे की, २१ एप्रिल २०१८ रोजी कसनूर- तुमिरगुण्डा येथे पोलिसांनी ४० नक्षलवाद्यांना मारले. या घटनेसाठी दोषी असलेल्या तीन ग्रामस्थांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. ते तिघेही पोलिसांचे खबरी म्हणून काम करत होते. १५० पैकी ७० नक्षलवादी हे गणवेशधारी होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
एप्रिल २०१८ मध्ये काय घडले होते ?
भामरागड-एटापल्ली तालुक्यांच्या सीमावर्ती भागातील बोरिया जंगलात गडचिरोली पोलिसांच्या सी-६० पथकाने २१ एप्रिल रोजी रात्रीपासून शोधमोहीम राबवली होती. यादरम्यान, नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी चारही बाजूंनी घेरून नक्षलींवर गोळीबार केला. त्यात ४० नक्षलवादी ठार झाले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2019 9:34 am