गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हिंसाचार सुरुच असून शनिवारी नक्षलवाद्यांनी दोन ग्रामस्थांची हत्या केली. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून या हत्या करण्यात आल्या आहेत. गेल्या १५ दिवसांमध्ये गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी एकूण सात ग्रामस्थांची हत्या केली आहे.

गडचिरोलीतील मारकेगावात नक्षलवाद्यांनी शनिवारी पहाटे दोन ग्रामस्थांची हत्या केली. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून त्यांची हत्या करण्यात आली. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात याच गावालगतच्या इंद्रावती नदीच्या पात्रात नक्षलवाद्यांनी मुक्काम केला होता. त्यानंतर पहाटे झालेल्या चकमकीत ४० नक्षलवादी ठार झाले होते. त्याचा बदला घेण्यासाठी नक्षलींनी काही दिवसांपूर्वी कसनासूर गावात तीन ग्रामस्थांची हत्या केली होती. जहाल नक्षलवादी नंबाला केशव राव ऊर्फ गगन्ना ऊर्फ बसवराजू याने महासचिव पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून नक्षली आक्रमक झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ५१६ आदिवासी बांधवांची हत्या केली आहे.