प्रबोध देशपांडे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प; वारी, यात्रा, महोत्सव रद्द झाल्याने नुकसान करोनाच्या संकटातून अकोला जिल्हय़ातील गांधीग्राम येथील प्रसिद्ध गुळपट्टी उद्योगही यातून सुटला नाही. राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यापासून गुळपट्टी उद्योगाची महिन्याकाठची लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली. राज्यातील वारी, यात्रा, महोत्सव रद्द झाल्याने गुळपट्टी उत्पादकांना मोठय़ा नुकसानीचा सामना करावा लागत आहे. आता हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येत असताना गुळपट्टी उद्योगावर मात्र ‘पॅकिंग’चे नवे संकट घोंघावत आहे. अकोला जिल्हय़ातील गांधीग्राम गावाने गुळपट्टीसाठी मध्य भारतात आपली विशेष ओळख निर्माण केली. ब्रिटिशकाळापासून येथे गुळपट्टी तयार केली जाते. २००१ पासून खऱ्या अर्थाने गावातील प्रमुख व्यावसायिक सुखदेवराव अढाऊ यांनी गुळपट्टी उद्योगाला व्यापक स्वरूप दिले. गुळपट्टीला गांधीग्रामपुरतेच मर्यादिन न ठेवता त्यांनी यात्रा, महोत्सवांसह इतर ठिकाणीही विक्री करून लोकप्रियता मिळवून दिली. शेतीवर आधारित गांधीग्राममधील शेतकरी गुळपट्टीच्या पूरक व्यवसायातून उद्योजक झाले. पौष्टिक आणि चविष्ट गांधीग्राम गुळपट्टीचा संपूर्ण महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, राजस्थान आदी राज्यांमध्ये लौकिक आहे. विविध प्रदर्शनांमध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून देशभर याची विक्री होते. गुळपट्टी उद्योगाची ग्रांधीग्राम येथील वार्षिक उलाढाल अडीच कोटींच्या घरात आहे. महिन्याला २० ते २५ लाखांचे व्यवहार होतात. प्रमुख तीन ते चार उत्पादकांसह गावातील सुमारे ५० कुटुंबे गुळपट्टीचे उत्पादन करतात. या उद्योगावर गांधीग्राम गावातीलच २०० लोकांचा व इतर ठिकाणच्या शेकडो लोकांचा रोजगार अवलंबून आहे. गांधीग्राम गुळपट्टी उद्योग मोठी घेप घेत असतानाच करोनाचा त्यालाही चांगलाच फटका बसला. करोला व टाळेबंदीमुळे २२ मार्चपासून गुळपट्टी उद्योगाची उलाढाल ठप्प झाली. अडीच महिन्यापासून गुळपट्टीचे उत्पादन व विक्री संपूर्णत: बंद आहे. त्यामुळे शेकडो लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. आता सर्व व्यवहार पूर्वपदावर येत असताना गुळपट्टीचे उत्पादनही गत चार-पाच दिवसांपासून सुरू करण्यात आले. मात्र, सध्या पूर्वीप्रमाणे गुळपट्टीला मागणी नसल्याचे चित्र आहे. गुळपट्टी उद्योगापुढे नवीनच संकट उद्भवले. आतापर्यंत गांधीग्राम गुळपट्टीची हॉटेल, दुकान किंवा चारचाकी मालवाहू गाडय़ांमधून एक पाव, अर्धा किलो, एक किलो अशी कागदात बांधून विक्री केली जात होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर ‘पॅकिंग’ वस्तू घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. कागदात बांधून दिलेली गुळपट्टी ग्राहक घेण्यास टाळत आहेत. गुळपट्टीला प्लास्टिकच्या आवरणाने ‘पॅकिंग’ केल्यास त्याला काही दिवसांनी एक प्रकारे वास येऊ शकतो, अशी माहिती उत्पादक सुखदेवराव अढाऊ यांनी दिली. त्यामुळे गुळपट्टी उद्योगाला नव्याच समस्येचा सामना करावा लागत आहे. गुळपट्टीचा प्रमुख व्यवसाय वारी, यात्रा, महोत्सवावर आधारित आहे. राज्यात दरवर्षी विविध ठिकाणी होणाऱ्या या उत्सवांमध्ये गांधीग्राम गुळपट्टीची मोठय़ा प्रमाणावर विक्री होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सर्व कार्यक्रम रद्द झाले. त्यामुळे गुळपट्टी उद्योग चांगलाच अडचणीत आला. गुळपट्टी उद्योगाने नव्याने उभारी घेण्यासाठी करोनासह विविध संकटांवर मात करण्याचे उत्पादकांपुढे मोठे आव्हान आहे. पंढरपूरला दरवर्षी ५० लाखांची गुळपट्टी गूळ, शेंगदाणे व पाण्यापासून तयारी झालेली गांधीग्राम गुळपट्टी उपवासासाठी सात्त्विक आहार समजली जाते. या गुळपट्टीसाठी कोल्हापूर, लातूर, बैतूल, बिजापूर येथील गावराणी गुळाचा वापर होतो. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला गुळपट्टीची मोठी मागणी असते. सुमारे ५० लाखांची ४०० ते ५०० क्विंटल गुळपट्टी पाठवण्यात येते. दानशूरांकडून वारीमध्ये वारकऱ्यांना पौष्टिक गुळपट्टीचे वाटप होते. यावर्षी महोत्सव व वारी रद्द झाल्याने तो संपूर्ण व्यवसाय बुडाला आहे. प्रशिक्षणातून अनेक उद्योजक घडले गांधीग्रामची गुळपट्टी सर्वत्र प्रसिद्ध असल्याने या उद्योगाचा अभ्यास करण्यासाठी अनेक ठिकाणावरून लोक येथे येतात. सुखदेवराव अढाऊ यांच्या राजलक्ष्मी गुळपट्टीमध्ये युवक व बचत गटाच्या महिलांना प्रशिक्षण देण्यात येते. त्यातून अनेक गुळपट्टी उद्योजक घडले आहेत. बारामती, कर्जत, अहमदनगर येथील युवकांनाही प्रशिक्षण देण्यात आले. करोनामुळे गांधीग्राम गुळपट्टी व्यवसायाचे मोठे नुकसान झाले. गत अडीच महिन्यापासून उद्योग ठप्प आहे. गुळपट्टी उद्योग नव्याने सुरू करण्यातही विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. - सुखदेवराव अढाऊ, राजलक्ष्मी गुळपट्टी, गांधीग्राम