गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र गणपती आगमनाची धूमधाम सुरु आहे. सगळीकडे नवचैतन्याचं वातावरण पसरलं असून गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे आता हा उत्साह कायम ठेवत उद्या बाप्पाचं वाजतगाजत आगमन होणार आहे. बाप्पा ज्यावेळी घरी येत असतो. त्यावेळी त्याचा चेहरा रुमालाने झाकला जातो. पण बाप्पाचा चेहरा का झाकतात? किंवा गणपतीची मुर्ती आणणाऱ्या व्यक्तीने टोपी का घालावी ? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. याच प्रश्नाचं उत्तर पंचांगकर्ते श्री.मोहन दाते यांनी ‘प्रश्न तुमचे उत्तर पंचांगकर्त्यांचे’च्या विशेष भागात दिले आहेत. १. गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नेताना ज्याच्या हातात मुर्ती असेल त्या व्यक्तीने डोक्यावर टोपी घालणे किंवा रुमाल घेण्यामागचे कारण काय? कोणतेही धार्मिक कार्य करताना ठराविक वेषभूषा असते. पूर्वीच्या काळी सर्वच लोक डोक्यावर टोपी, मुंडासं, पगडी वापरत असतात. तसेच खांद्यावर उपरणं असा पूर्ण पोशाख केलेला असे. हा पोशाखदेखील या कार्यांमध्ये महत्वाचा असतो. मात्र सध्या या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. त्यामुळेच या पूर्ण पेहरावापेक्षा केवळ डोक्यावर टोपी घेतली तरी पुरेशी असते. मात्र देवाचा मान राखण्यासाठी ही टोपी आवर्जून डोक्यावर घालावी. २. गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी आणताना तिचा चेहरा अर्धवट झाकण्यामागचे कारण काय? गणेशाची मुर्ती घरी आणताना तिचा चेहरा झाकावा असं सक्तीचं नाही. काही जण बाप्पाचा चेहरा झाकतात. तर काही जण नाही. मात्र ही प्रथा आपोआप पडलेली आहे. याला कोणतेही धर्मशास्त्रीयदृष्ट्या कारण नाही. काही प्रदेशात बाप्पाचा चेहरा झाकण्याची प्रथा आहे.तर काही ठिकाणी नाही. ३. गणपतीसमोर विशिष्ट संख्येच्या मोदकांचा प्रसाद ठेवला जातो त्यामागचे कारण काय? प्रत्येक देवतेच्या काही संख्या आहेत जसे १२ रवि, ११ रुद्र म्हणजेच शंकर त्याप्रमाणे गणेशाची संख्या २१ आहे म्हणून २१ मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. ४. गणेश स्थापने दिवशी फक्त एकदाच आरती करावी, का दोन्ही वेळी करावी ? (म्हणजे फक्त स्थापना झाल्यावर, की सकाळ संध्याकाळ) गणेशस्थापना केल्यावर विसर्जनापर्यंत रोज सकाळी व संध्याकाळी आरती करावी. स्थापनेच्या दिवशी सकाळी पूजा केली असली तरी संध्याकाळी आरती करावी.