Ganesh Visarjan 2020 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… असं म्हणत आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस. दरवर्षी ढोल ताशाच्या गजरात, वाजतगाजत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. पण यंदा करोना साथीचे संकट असल्यामुळं गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यामुळं सोशल डिस्टनसिंग आणि शांततेत बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. दिमाखदार विसर्जन मिरवणूक सोहळा यंदा पार पडणार नसला तरी विसर्जनाच्या दिवशी ठेवण्यात येणारा बंदोबस्त कायम ठेवण्यात येणार आहे.

अनंत चतुर्दशीला मुंबई आणि पुण्यातील माहौल कसा असतो, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण यावर्षी मुंबईचा राजा, लालबागचा राजा किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचं निर्णय घेतला आहे. परिणामी यंदाचं चित्र पूर्णत: वेगळं आहे. तर पुण्यातील गणेशोत्सवाची ख्यातीही देशभरात आहे, करोना संकटात इथेही साधेपणा विसर्जन सोहळा पार पडणार आहे. मानाच्या गणपतीचं मंडपातच विसर्जन होणार आहे. मिरवणुकीच्या आदल्या दिवशी सायंकाळनंतर मंडळांचे कार्यकर्ते ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन मिरवणूक मार्गावर यायचे. त्यानंतर रांगा लावणारे कार्यकर्ते आणि पोलीस मिरवणूक मार्गावर असायचे. यंदा हे दृश्य पाहायला मिळले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना चुकचुकल्यासारखे वाटत आहे.

विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांची तयारी आदल्या दिवशी सुरू व्हायची. विसर्जन मिरवणुकीतील आकर्षक रथ तसेच सजावट डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरते. विसर्जन मार्गावर आदल्या दिवशी ट्रॅक्टर-ट्रॉली आणून रात्रभर त्यावर सजावटीचे काम करायचे. रात्रभर जागरण करून पुन्हा कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी व्हायचे. विसर्जन मिरवणुकीत साकारण्यात येणारे आक र्षक रथाचे काम यंदा पाहायला मिळत नाही. मिरवणुकीत कोणता देखावा साकारला जाणार आहे, याची उत्सुकता कार्यकर्त्यांबरोबरच सामान्यांना असते. यंदाच्या वर्षी गणेशोत्सवावर करोनाचे सावट असल्याने मिरवणुकीच्या आदल्या दिवशीची लगबग तसेच जल्लोषी वातावरण नव्हते.

करोनामुळे नोकरदारापासून उद्योजकापर्यंत साऱ्यांवरच ओढवलेले आर्थिक संकट, करोनाची भीती आणि सरकारी र्निबध या कारणांमुळे यंदा गणेशोत्सवाचा डामडौलच दिसेनासा झाला आहे. अनेक कुटुंबे, गृहनिर्माण संस्था तसेच सार्वजनिक मंडळांनी यंदा गणेशोत्सवच रद्द केला तर, उर्वरित भक्तांनीही अतिशय शांततेत आणि साध्या वातावरणातच बाप्पाला निरोप द्यायचा ठरवलं आहे.