सुशोभीकरणानंतरही तलावात प्लास्टिकसह निर्माल्य टाकणे सुरूच

लोकसत्ता वार्ताहर

पालघर : पालघर शहरातील श्री गणेश कुंड तलाव निर्माल्य कचऱ्याने भकास झालेला आहे. येथे निर्माल्य टाकण्यासाठी  कलश ठेवण्यात आले असले तरी काही पालघरवासीय या तलावात सर्रासपणे प्लास्टिकच्या पिशव्यांमधून निर्माल्य तलावात टाकत आहेत. त्यामुळे सुशोभीकरण केलेला हा एकमेव तलाव कचऱ्याच्या विळख्यात सापडला आहे.

पालघर ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून हा तलाव अस्तिवात आहे. सुमारे पंधरा वर्षांत या तलावाचे श्री गणेश कुंड असे नामकरण करण्यात आले.  या तलावाला ‘क’ दर्जा पर्यटनस्थळाचे मानांकन मिळाले आहे.  या तलावात पालघर शहर व परिसरातील सणासुदीतील शेकडोच्या संख्येने सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्ती, दुर्गामूर्ती, विश्वकर्मामूर्ती विसर्जन केले जाते. याचबरोबर छटपूजा, दशक्रिया विधी असे आध्यात्मिक कार्यक्रमही येथे केले जातात. हे सण व कार्यक्रमादरम्यान तलावात जमा होणारा  फूलयुक्त निर्माल्य नगर परिषदेमार्फत उचलला जाऊन तलावाची साफसफाई केली जाते. मात्र एरवी या तलावात नागरिक राजरोसपणे निर्माल्याच्या पिशव्या टाकत आहे. कचरा तलावातील पाण्यात  पडून राहिल्याने तो कुजतो व त्याची दरुगधी येत राहते. त्यामुळे परिसरात डासांचा उपद्रव वाढला आहे. अलीकडेच जिल्हा नियोजन निधीतून या तलावाच्या सुशोभीकरणासाठी कोटय़वधींचा निधी खर्च करण्यात आला होता.

सुरक्षा रक्षकाची मागणी

नगर परिषदमार्फत या तलावाची वारंवार स्वच्छता केली जाते. मात्र त्यानंतरही नागरिक या तलावात दररोज प्लास्टिक पिशव्यातून निर्माल्य टाकत असल्याने ही मोठी समस्या उभी राहिली आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी होत आहे.

नागरिकांनी या ठिकाणी निर्माल्य टाकल्यास नगर परिषद दंडात्मक कारवाई करेल. नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषदेला सहकार्य करणे अपेक्षित आहे.

– स्वाती देशपांडे-कुलकर्णी, मुख्याधिकारी