इयत्ता नववीच्या वर्गात अनुत्तीर्ण झाल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या एका १४ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शहरातील सलगर वस्ती भागात घडलेल्या या घटनेची नोंद सलगर वस्ती पोलीस ठाण्यात झाली आहे.
प्रांजली चंद्रकांत गायकवाड (रा. भैरू वस्ती, सलगर वस्तीजवळ, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. यापूर्वी दहावी परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी म्हणजे ७० टक्के गुण मिळालेल्या एका मुलीने आत्महत्या केली होती. त्यानंतर नववीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याचा मनस्ताप करून घेऊन प्रांजली गायकवाड हिने आत्महत्येचा मार्ग पत्करला. नववीच्या वर्गातील अन्य मैत्रिणी उत्तीर्ण होऊन दहावीच्या वर्गात गेल्याने प्रांजली हिला वैफल्याने ग्रासले होते. तिची समजूत काढली तरी तिने अखेर वैफल्यातून आत्महत्या करून मृत्यूला कवटाळले.