तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कासा : वरवाडा येथील शासकीय आश्रमशाळेत अकरावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय आदिवासी विद्यार्थिनीने मानसिक तणावातून आत्महत्या केली. सारिका करबट असे या विद्यार्थिनीचे नाव असून डहाणू तालुक्यातील घाडणे येथील ती रहिवासी होती. तलासरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिवासी विकास प्रकल्पअंतर्गत तलासरीतील ठक्कर बाप्पा विद्यालयाच्या पटांगणात खेळाच्या स्पर्धा २६ ते २८ नोव्हेंबपर्यंत सुरू होत्या. या स्पर्धासाठी स्पर्धक, खेळाडू व शिक्षक स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित होते. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी आश्रमशाळेतील चार विद्यार्थिनी कोणालाही काहीही माहिती न देता आश्रमशाळेतून निघून गेल्या. याची माहिती आश्रमशाळेच्या अधीक्षिका के. सी. मसराम यांनी मुख्याध्यापक एस. बी. पाटील यांना दिली. या वेळी मुख्याध्यापक पाटील यांनी विद्यार्थिनींच्या पालकांना दूरध्वनीवरून दिली. त्यांनी शोधाशोध सुरू केली. पण माहिती मिळत नसल्याने त्यांनी तलासरी पोलिसांना सांगितले. या चारही विद्यार्थिनी डहाणूतील चरी कोटबी येथे असल्याचे समजताच पोलीस व शिक्षक त्या ठिकाणी गेले आणि त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. याबाबतची माहिती त्यांच्या पालकांना दिली. सारिकालाही तिचे काका सुरेश करबट व आई कमू यांनी पोलीस ठाण्यातून घेऊन घरी नेले. शुक्रवारी सकाळी सारिकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सारिका आणि तिच्या तीन मैत्रिणी वसई येथील शाळेत दहावीपर्यंत एकत्र शिकत होत्या. दहावीनंतर या चौघींनी एकत्रच वरवाडा आश्रमशाळेत प्रवेश घेतला. या चौघीही गुरुवारी सकाळी आश्रमशाळेतून कोणालाही काहीही न सांगता आपल्या परिचिताच्या घरी गेल्या व तेथून एकीने आपल्या घरी मोबाइलवरून फोन करून आम्ही सुखरूप आहोत. आमचा तपास करू नका, असे सांगितले. पोलिसांनी मोबाइलच्या क्रमांकावरून ठावठिकाणा शोधून चौघींना ताब्यात घेतले होते. मात्र सारिकाने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.