भंडारा शहराजवळ असलेल्या वैनगंगा नदीत उडी घेऊन एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. नदीत उडी मारण्यापूर्वी या प्रेमी युगुलाने एकमेकांच्या हातात हात घालून ते ओढणीने बांधून घेतले होते. या घटनेमुळे भंडारा शहरात खळबळ उडाली आहे. दोघांजवळ सापडलेल्या मोबाइलच्या साहाय्याने त्यांची ओळख पटली. विशाल गणेश शेंडे (वय २०) आणि दीक्षा मारबते (वय २०) असे आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलांची नावे आहेत.

विशाल आणि दीक्षा हे दोघेही मावस भावंडे होती. यामुळे त्यांच्या प्रेमसंबंधांना आणि लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असावा त्यामुळेच या दोघांनी आत्महत्या केली असावी असे बोलले जाते.

हे दोघेही भंडाराजवळील जाव्हारानगर येथे राहत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारधा गावात वैनगंगा नदीच्या तीरावर त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.