संजय राऊत यांनी वीर सावरकर यांच्याबाबत जे वक्तव्य केलं त्याचं मी स्वागत करतो. ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भारतरत्न पुरस्काराला विरोध दर्शवायाचा आहे त्यांना दोन दिवस अंदामानात पाठवलं पाहिजे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. या वक्तव्याचं मी स्वागत करतो कारण हे वक्तव्य म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलेला सल्लाच आहे असं सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचा वीर सावरकरांना विरोध असतानाही संजय राऊत यांनी हा सल्ला देण्याचं धाडस दाखवलं त्याचं मी कौतुक करतो असंही रणजीत सावरकर म्हणाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेची भूमिका सावरकरांना पाठिंबा देणारी आहेच. आता येत्या काळात शिवसेना काँग्रेसचीही समजूत घालेल आणि त्यांना सांगेल की तुमचा सावरकर विरोध हा फुकाचा आहे तो बाजूला ठेवा असा विश्वासही रणजीत सावरकर यांनी व्यक्त केला. दरम्यान संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं त्याचा पक्षाशी काही संबंध नाही असं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच किती दिवस आपण इतिहासावरच बोलायचं? असाही प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच इंदिरा गांधी या डॉन करीम लाला याला भेटण्यासाठी मुंबईत येत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. त्यामुळे बराच वाद निर्माण झाला. काँग्रेस नेत्यांनी संजय राऊत यांच्याविरोधातली नाराजीही उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली होती. ज्यानंतर संजय राऊत यांनी हे वक्तव्य मागे घेतलं. आता वीर सावरकर यांच्याबाबत त्यांनी भूमिका मांडली आहे. आता याबाबत काँग्रेस काय बोलणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.