भरधाव वेगाने येणार्या रेल्वेखाली बकऱ्यांचा कळप चिरडला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील बल्लारपूर मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगजवळ ही धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेत जवळपास १०० बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चुनाळा येथील लिंगय्या नामक गोलकर व्यक्तीच्या जवळपास १५० बकऱ्यांचा कळप रेल्वे क्रॉसिंग जवळील एका शेतात बसवण्यात आला होता. परंतु सकाळी अचानक हा कळप रेल्वे क्रॉसिंगच्या दिशेने पळत सुटला आणि नेमक्या त्याच वेळेस रेल्वे आल्याने दुर्दैवाने जवळपास १०० बकर्‍या आणि मेंढ्या चिरडल्या गेल्या. या घटनेमुळे बकरी मालकाचे जवळपास चार लाखांचे नुकसान झाले असून त्याला भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.