जळगावची सुवर्णनगरी देशभरातील ग्राहकांना आकर्षित करते. केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर, लगतच्या गुजरात, मध्य प्रदेशसह देशातील ग्राहक सोने खरेदीला पहिली पसंती देतात. विजयादशमीच्या दिवशी या बाजारातील लखलखाट काही और असतो. यावर्षी दसऱ्यापूर्वीच सोन्याच्या दरात कमालीची घसरण झाल्यामुळे या सुवर्णनगरीतील उलाढाल अधिकच वाढण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, पारंपरिक ग्राहकांबरोबर लग्नसराईच्या खरेदीसाठी हा मुहूर्त साधला जाईल. इतिहास सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या जळगावची सराफ बाजारपेठ देशातील सर्वात जुन्या बाजारपेठेत गणली जाते. तब्बल १६० वर्षांची परंपरा या बाजारपेठेला आहे. १८६४ मध्ये राजमल लखीचंद ज्वेलर्सने जळगावच्या सराफ बाजाराची मुहूर्तमेढ रोवली. पुढील काळात ती विस्तारत गेली. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यास जळगावमधील सराफ व्यावसायिकांनी प्राधान्याने लक्ष दिल्यामुळे देशातील सोन्याची महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ती आज नावारूपास आली आहे. स्थित्यंतर : १९६२ मध्ये सोने नियंत्रण कायदा आल्याने अनेकांनी सुवर्ण व्यवसाय बंद केले होते. त्या वेळी काहींनी पर्यायी व्यवसाय सुरू केले. या कायद्याचा जाच संपुष्टात आल्यानंतर या बाजाराने पुन्हा भरारी घेतली. बदल : एकत्र कुटुंब पद्धतीनुसार पूर्वीच्या काळी चाललेल्या या व्यवसायातील उलाढाल उत्तरोत्तर वाढली. त्यामुळे स्थानिक सराफी पेढय़ांनी इतर जिल्ह्य़ांत आपली भव्य दालने उभारत ग्राहकांना जळगावमधील सोने त्यांच्या शहरात उपलब्ध करण्याची व्यवस्था केली. हजारो जणांना रोजगार दागिने घडविण्याचे काम तब्बल सहा ते सात हजार कारागीर करतात. त्यात गुजराती, बंगाली व राजस्थानी कारागीरांचा समावेश आहे. सोने-चांदी आखणी करणारे दीड हजार कारागीर आहेत. या बाजाराच्या माध्यमातून जवळपास दहा हजार जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. वैशिष्टय़े शुद्धता, विश्वासार्हता, सचोटी या त्रिसूत्रीवर या ठिकाणी काम होत असल्याचे व्यावसायिक सांगतात. मुख्यत्वे या ठिकाणी मजुरीचे दर तुलनेत कमी आहेत. तसेच जुने दागिने देऊन नवीन दागिना घ्यावयाचा असल्यास घडणावळ कमी पकडली जाते. त्यातही काही विशिष्ट पेढय़ांमधून खरेदी केलेल्या दागिन्यांसाठी तो परत करताना अथवा नवीन दागिना खरेदी करताना घडणावळ पकडली जात नाही. त्यामुळे ग्राहकांचे नुकसान टळते. दागिन्यांचे नवीनतम प्रकार, सोने देणे असो वा घेणे चोख व्यवहार हे या बाजारपेठेचे वेगळेपण ठरले आहे. राजकीय प्रभाव कोटय़वधींची उलाढाल असणाऱ्या या बाजारपेठेवर काही राजकीय व्यक्तींचाही प्रभाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक खासदार ईश्वर जैन कुटुंबीयांची सर्वात जुनी पेढी आहे. भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी नव्याने या व्यवसायात पदार्पण केले आहे. सोने शुद्धीकरण प्रकल्प (धुळे) खानदेशातील धुळे जिल्ह्य़ात शिरपूर येथे सोने शुद्धीकरण प्रकल्पाची संकल्पना काँग्रेसचे आमदार अमरिशभाई पटेल यांनी प्रत्यक्षात आणली. पुढील काळात पटेल कुटुंबीयांनी अन्य उद्योगपतीला हा प्रकल्प विकला. या प्रकल्पाद्वारे शेकडो रोजगार उपलब्ध झाले आहेत. शिवाय खानदेशातील सुवर्ण बाजाराला सोन्याशी निगडित उद्योगाची किनार लाभली. संकलन : मुकेश पवार