कल्हई लावा कल्हई.. ही गल्ली बोळात पूर्वी नेहेमी ऐकू येणारी चिरपरिचित हाक काळाच्या ओघात मागील पंधरा, वीस वर्षांत बंदच झालेली दिसून येत आहे. एकेकाळी जुन्याचे सोनं करणारा हा व्यवसायच काळाच्या पडद्याआड गेला होता. मात्र, करोना काळात अनेकांनी तांब्या, पितळेच्या भांडय़ांना आपलेसे केल्याने कल्हईच्या व्यवसायाला पुन्हा सुगीचे दिवस येत आहेत.

तांब्या, पितळी भांडय़ातील अन्न नासू नये यासाठी या भांडय़ाना आतून कल्हई लावली जायची. पण हळुहळू माणूस आधुनिकतेकडे वळला, घरातील तांब्या पितळेची भांडी संसारातूनच हद्दपार झाली. आणि त्या जागेवर स्टील, अल्युमिनियमची भांडी आली. त्यामुळे कल्हई लावण्याचा व्यवसायही हद्दपार झाला होता. तांबे, पितळी भांडय़ांना आतून कल्हई लावण्यासाठी कल्हईवाले गावोगावी फिरून आपला व्यवसाय करायचे. गावातील सावली देणाऱ्या एखाद्या झाडाखाली कल्हई लावणारा बसायचा. तो कोळशाच्या निखाऱ्यावर भांडे गरम करून नवसागराची पूड टाकून स्वच्छ करुन लगेचच कथलाची कांडी फिरवायचा. ही कांडी जादुई करामत करून तांबे, पितळेचे भांडे आतून चांदीसारखे चमकायचे. त्यामुळे कल्हईवाला जीवनाचा अविभाज्य घटक असल्याने सदैव त्याचे सर्वत्र स्वागत व्हायचे.

वीस वर्षांपूर्वी गरीब असो वा श्रीमंत, झोपडीतला असो वा बंगलेवाला सगळ्यांकडेच तांबे, पितळीची भांडी असायचीच. कल्हई करणारा आपल्या कौशल्याने गरम चटके वाचवत लोकांना रुपेरी भांडी वापरायचा अनुभव अगदी नाममात्र पैशात देत असे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी तांब्या, पितळेच्या भांडय़ातून शिजविलेल्या स्वयंपाकाला प्राधान्य दिले आहे. अनेकजण तांब्या, पितळेच्या भांडय़ातील पाणी पित आहेत. जगाला कल्हईच्या भांडय़ातील पदार्थाचे शास्त्रीय महत्त्व पटत आहे. त्यामुळे आता कल्हई लावा कल्हई.. ही हाक ग्रामीण भागात कानी पडत आहे.