वसई : वसई पूर्वेतील महामार्गावरील तानसा नदीच्या पुलावरून प्रवास करताना रात्रीच्या सुमारास रस्त्याचा अंदाज न आल्याने मालवाहतूक कंटेनर थेट नदी पात्रात कोसळला. शुक्रवारी मध्यरात्र उलटून शनिवारी रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास हा कंटेनर २० ते २५ फूट खोल नदीपात्रात कोसळला. या अपघातादरम्यान वाहनचालकाने वाहत्या नदीपात्रातून केबिनच्या फुटलेल्या काचेतून उडी टाकून किनारा गाठला व आपले प्राण वाचविले. यामध्ये वाहनचालक किरकोळ जखमी झाला आहे. संतोष कुमार यादव (३५) असे त्याचे नाव असून केवळ पोहता येत होते म्हणून माझे प्राण वाचले असे त्याने सांगितले. तसेच अपघाताची तीव्रता व नदीच्या प्रवाहाची गती पाहता सुदैवाने मोठी हानी झाली नाही. मध्यरात्रीनंतर सुमारे एक ते दीड वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू असताना खराटतारा उड्डाणपूल उतरत असताना गाडीचे ब्रेक फेल झाल्याने वाहन नियंत्रणात न आल्याने अपघात झाल्याचे चालकाने सांगितले.