वैद्यनाथ साखर कारखान्यात ८ डिसेंबरला झालेल्या दुर्घटनेत १२ लोक जखमी झाले आणि ५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची तीव्रता लक्षात घेऊन पंकजा मुंडे यांनी १२ डिसेंबरला गोपीनाथगडावर होणारा गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचा कार्यक्रम रद्द केला आहे. पंकजा मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट

८ डिसेंबर २०१७ रोजी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्या मध्ये जो अत्यंत भीषण अपघात झाला त्यामध्ये १२ लोक गंभीर जखमी झाले. त्यापैकी ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. वैद्यनाथ कारखान्याचे सर्व कर्मचारी, संचालक मानसिक धक्क्यात आहेत. मी या भागाची लोकप्रतिनिधी, पालक व कारखान्याची चेअरमन म्हणून व्यथित आहे. वैद्यनाथ कारखाना हा लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांच्या पश्चात वैद्यनाथ सहकारी कारखाना हे त्यांच्या कष्टाचे आणि स्वप्नाचे प्रतीक म्हणून आमच्यासाठी हा जिवाभावाचा विषय आहे. या कारखान्यात असा विचित्र अपघात घडल्यामुळे त्याची कारणे काय आहेत हे आम्ही शोधत आहोत.

शोकाकुल परिवार हा कारखान्याशी अनेक वर्षे संबधीत असल्यामुळे तो आमचाही परिवार आहे. त्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्यांना नोकरी देण्याची शाश्वती देणे आमचे कर्तव्य आहे. परंतु या कुटुंबातील व्यक्ती गमावल्याचे दुःख त्यांच्या सोबत आम्हालाही आहे.

महाराष्ट्रातील लोकनेते मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक १२ डिसेंबरला राज्यातील कानाकोपऱ्यातुन साहेबांच्या ओढीने गोपीनाथ गडावर येत असतात. साहेबांच्या समाधीचे दर्शन करून इथल्या सामाजिक उत्थान दिनाच्या कार्यक्रमातून ऊर्जा, प्रेरणा व आशा घेऊन जातात. कारखान्यातील दुर्दैवी घटनेनंतर राज्यातील लोकांचा साहेबांच्या दर्शनासाठी येणारा ओघ थांबवता येणार नाही. पण दरवर्षी प्रमाणे त्यादिवशी आयोजित केलेले कार्यक्रम जे वंचित, महिला, ऊसतोड कामगार यांच्यासाठीच आहेत ते या परिस्थितीत रद्द करत आहोत. मी स्वतः माझ्या परिवारा समवेत गोपीनाथ गडावर सकाळी ११ वाजल्यापासून लोकांच्या भेटीसाठी उपस्थित राहीन, जेणेकरून विविध ठिकाणाहून पायी दिंडी, संघर्ष ज्योत, रथ यात्रा घेऊन निघालेल्या लोकांची माझी भेट होऊ शकेल.

माझ्या कारखान्यातील जणू माझा परिवार असलेल्या शोकाकूल कुटुंबाच्या दुःखात सहभागी होणं, त्यांच्या वेदनांशी समरूप होणं हीच मुंडे साहेबांची खरी शिकवण आहे, साहेबांच्या शिकवणी प्रमाणे वागून आयोजित कार्यक्रम रद्द करून जयंतीच्या दिवशी मुंडे साहेबांचे स्मरण करणे साहेबांच्या विचाराशी समर्पक होईल. आपण समजून घ्याल हा विश्वास आहे.

-पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पेजवर ही पोस्ट करण्यात आली आहे. गोपीनाथ गडावर होणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री उमा भारतीही येणार होत्या. मात्र वैद्यनाथ कारखान्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.