राज्य सरकारच्या सेवेतील शारीरिकदृष्टय़ा अपंग कर्मचाऱ्यांना कार्यालयात अर्धा तास उशिरा येण्याची सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारची अनेक कार्यालये सकाळी साडेनऊ वाजता सुरू होतात. कामावर वेळेवर पोचणे अपंग कर्मचाऱ्यांना त्रासदायक ठरते. विशेषत: मुंबई, पुणे, नागपूर तसेच इतर शहरांत इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे धावपळ करणे त्यांना अशक्य होते. इतरांप्रमाणे धावून वाहन पकडणे किंवा भरभर चालणे त्यांना शक्य होत नसल्याने कामावर पोचण्यास वेळ लागतो. कर्मचारी संघटनांनी अनेकदा अर्ज-निवेदने देऊन सरकारचे या समस्येकडे लक्ष वेधले होते. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. या निर्णयाचे अपंगांच्या संघटनेचे नेते डॉ. संजय बजाज यांनी स्वागत केले आहे.