जनतेचा भाजपवरील विश्वास उडाला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका कधीही घेतल्या तरी त्यासाठी आम्ही तयार आहोत. भाजपचे केंद्र आणि राज्यातील सरकार हे केवळ जाहिरातबाजी करणारे सरकार आहे. त्यांच्यावरील सामान्य जनतेचा आणि शेतकऱ्यांचा विश्वास उडाला आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ते जालना जिल्ह्य़ातील घनसावंगी येथे शेतकरी मेळाव्यात बोलत होते. शिवसेनेच्या वाघाची शेळी आणि आता कासव झाले असल्याची टीका राष्ट्रवादीने करत, सत्ता सोडण्याचे आव्हान दिले होते. त्याचा उल्लेख करत  उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेस सत्ता सोडण्यास सांगणारे तुम्ही कोण ? ही सत्ता जनतेने दिलेली आहे. अजित पवार बिन शेपटीचे आणि बिनशिंगाचे प्राणी असून त्यांना धरण आणि कालव्याच्या आजूबाजूला फिरकू देऊ नका असा टोलाही लगावला.

‘डल्ला मारणाऱ्यांचा हल्लाबोल’

औरंगाबाद : उद्धव ठाकरे यांनी रविवारी पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील शरद सहकारी साखर कारखान्यातील सभेमधूनही अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. बँकांमध्ये डल्ला मारणारे आता हल्लाबोल मोर्चा काढू लागले आहेत. आताच त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न जटिल वाटत आहेत. शेतकऱ्यांच्याविषयी कळवळा असल्याचे दाखवत आहेत अशी टीका केली.