सरकारचं आमच्यावर खूप प्रेम आहे, त्याचमुळे आम्हाला ईडीची नोटीस आली. अशा प्रेमपत्रांची आम्हाला सवय आहे असंही शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे. सध्या नोकऱ्यांची वानवा आहे, त्यामुळे पुरुषांनाही गृहद्योग करण्याची वेळ आली आहे असाही टोला शर्मिला ठाकरे यांनी लगावला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने नोटीस बजावली आहे. 22 ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशा नोटीशींना आम्ही भीक घालत नाही असं मनसेने म्हटलं आहे. तर राज ठाकरेंना असा प्रकारे ईडीमार्फत नोटीस बजावली जाणं ही सरकारची दडपशाही असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. आता या सगळ्या प्रकरणावर शर्मिला ठाकरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. अशा प्रेमपत्रांची आम्हाला सवय आहे सरकारचं आमच्यावर प्रेम आहे म्हणूनच नोटीस आली आहे असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे.