सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात समाजकल्याण खात्यामार्फत चालविण्यात येणाऱ्या मुला-मुलींच्या वसतिगृहाबाबत वेळोवेळी तक्रारी होऊनही त्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सावंतवाडीमधील मुलींच्या वसतिगृहातील हेळसांडीकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मुला-मुलींची असणारी वसतिगृहांची हेळसांड व विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा आणि अन्नाबाबत तक्रारी आहेत. मध्यंतरी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने आवाज उठविला होता. प्रा. गोपाळ दुखंडे यांनी यंत्रणेबाबत वरिष्ठांपर्यंत संपर्क साधला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील शैक्षणिक सुविधांबाबत अनुशेष आहे. त्यातच गरीब, डोंगरदऱ्यांत राहणारे विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात राहून वसतिगृहाच्या माध्यमातून शैक्षणिक सत्र पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. त्यातच समाजकल्याण खात्याच्या वसतिगृहात या मुलांसाठी निवासी सुविधा उपलब्ध करून देतानाच अन्न व निवाऱ्याचा प्रश्न सोडविला जातो.
सावंतवाडीत मुलींचे वसतिगृह आहे. तेथे पुरेसा स्टाफ नाही. तसेच जेवणाबाबत हेळसांड केली जाते. मुलींसाठी देण्यात येणारी फळे, दूधही वेळोवेळी दिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, सावंतवाडी नगर परिषद मागासकल्याण समिती सभापती गोविंद वाडकर, प्रा. गोपाळ दुखंडे अशा अनेकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे.