शेतकऱ्याची समुळ जात नष्ट करण्याचा डाव सरकारचा आहे असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. आज शेतकऱ्यांची वाईट स्थिती आहे. एकमेव अशी शेतकऱ्यांची जात आहे जी निसर्गाच्या सान्निध्यात उघड्यावर आपला धंदा करत आहे. आज शेतकरी स्वतः चं सरण स्वतः रचतोय आणि आपलं जीवन संपवत आहे. आज मंत्रीमंडळात शेतकऱ्यांचा प्रतिनिधी नसल्याने अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्याची समुळ जात नष्ट करण्याचा डाव सरकारचा आहे असा आरोप धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारवर केला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी तिजोरी खुली केली होती परंतु आजचे हे सरकार शेतकरी मेला तरी चालेल अशा भूमिकेत आहे असाही आरोप धनंजय मुंडे यांनी केला. धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. इमानदार चौकीदार आज देशाच्या चौकीदारामुळे बदनाम होत असेल तर यासारखे देशाचे दुर्दैव नाही असा टोला यावेळी धनंजय मुंडेंनी लगावला.

२ कोटी नोकर्‍या देणार म्हणून आजची ही तरुणाई ‘हर हर मोदी घर घर मोदी’ म्हणत उड्या मारत होती. परंतु साडेचार वर्षांत नोकरीच्या आमिषाने तरुणाला फसवलं हे लक्षात आल्यावर आज हिच तरुणाई दबक्या आवाजात बोलत आहे साधी सोयरीकही जुळली नाही असे सांगत आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं