राज्यातील महिलांवरील अत्याचार आणि हल्ल्यांना प्रतिबंध घालण्याबरोबरच आरोपींना वेळेत शिक्षा देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देखमुख यांनी दिली. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे उपस्थित होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत महिलांवरील वाढत्या हल्ल्यांच्या घटनाबाबत हे सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप केला होता. त्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर दिलं. देशमुख म्हणाले,” महिलावरील अत्याचार आणि हल्ल्यांच्या घटना थांबवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आरोपींना तातडीनं आणि कठोर शिक्षा करण्यासंदर्भात आंध्र प्रदेश सरकारनं कायदा केला आहे. तसा कायदा राज्यात करण्याच्या अनुषंगानं आंध्र प्रदेशात गेलो होतो. माझ्यासोबत वरिष्ठ अधिकारीही होते. तो कायदा नीट समजून घेतला आहे. दिशा कायदा महाराष्ट्रात करण्यासाठी आणि अधिक सुधारित स्वरूपात लागू करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. दिशा सारखा कायदा आणण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याचं काम हा कायदा करेल,” अशी माहिती देशमुख यांनी दिली.

कायदा सुव्यस्थेबद्दल काय म्हणाले होते फडणवीस?

“महिलांवर रोज अत्याचार होत असून, बलात्कार आणि जळीतकांडांची संख्या वाढत आहे. सरकारच्या माध्यमातून जी संवेदनशीलता दिसायला हवी, ती दिसत नाहीये. कारण पोलीस विभागांमध्ये सरकारच्या मार्फत प्रचंड राजकारण चालू आहे. कायदा व सव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे,” असा आरोप फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला होता.