हिवाळी अधिवेशन संपताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, आज कर्जमाफीची सर्वाधिक गरज अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना असताना त्यांना ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारने अवकाळीग्रस्तांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच अवकाळीग्रस्तांच्या कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला. कोल्हापूरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं ९४ लाख हेक्टरवरचं पीक वाया गेल आहे. त्यामुळे अशा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांनी घेतलेली कर्जे परत करण्याची त्यांची क्षमताच राहिलेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफीची सध्या सर्वाधिक गरज होती. मात्र, सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा या लोकांना होणार नाही.

सरकारवर टीका करताना फडणवीस म्हणाले, कर्जमाफीवरुन सरकारमधील पक्षांनी केलेलं हे दुसरं घुमजावं आहे. कारण शेतकरी कर्जमाफी, सातबारा कोरा करु अशा घोषणा सत्तेतील तिन्ही पक्षांनी आपल्या जाहिरनाम्यात दिल्या होत्या. हिवाळी अधिवेशनात सरकारने केवळ वेळ मारुन नेली आहे.

अवकाळीग्रस्तांना न्यायासाठी रस्त्यावर उतरणार – फडणवीस

सरकारची कर्जमाफीची उधारीची घोषणा आहे. आजच्या अडचणीतील शेतकऱ्यांना थेट मदत होणं गरजेचं होतं. त्याचबरोर सर्व प्रकारची मध्यम-दीर्घ मुदतीची सर्व कर्जे माफ केल्यासच सातबारा कोरा होतो. यापूर्वी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय आमच्या सरकारनेच घेतला होता. त्यामुळे कोल्हापूरच्या भागात या नव्या कर्जमाफीचा उपयोग होणार नाही. उलट अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफी योजनाचा फायदा मिळाला पाहिजे. सरकारने आपल्या आश्वासनांची पूर्तता करायला हवी. आम्ही लवकरच रस्त्यावर उतरुन अवकाळीग्रस्तांसाठीच्या कर्जमाफीची मागणी सरकारकडे करणार आहोत.

आणखी वाचा – ‘केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही’, अमृता फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

धनंजय महाडिकांच्या चुलत बंधुंचा भाजपा प्रवेश

यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश केला.