मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांचा सलग दुसऱ्यांदा झालेला विजय लक्षणीय मानला जात असला, तरी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अपुऱ्या यंत्रणेवर शिरीष बोराळकर यांनी घेतलेली मतेही लक्षवेधक ठरली आहेत. मात्र, पराभवाची कारणमीमांसा करताना भाजपचे कार्यकर्ते ‘रावसाहेबां’ च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावत आहेत. या निवडणुकीत १२ हजार ९६१ पदवीधरांना मतदान करता आले नाही, हा आकडाही अडाणीपणाचा मानला जात आहे.
मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर भाजप कार्यकर्त्यांंना मोठा धक्का बसला. त्यानंतर निवडणुकीची सूत्रे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हाती घेण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे झाले नाही. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्या. प्रचारही मोठय़ा प्रमाणात केला. तुलनेने शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून उभी केलेली प्रचारयंत्रणा अधिक प्रभावी ठरल्याचे दिसून आले. उस्मानाबाद मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चव्हाण निवडून यावे, यासाठी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे प्रयत्न झाल्याचे ऐकिवातही नाही. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी प्रचारातून चक्क अंग काढून घेतल्याचे चित्र या जिल्ह्य़ात होते. मात्र, तरीही उस्मानाबाद तालुका वगळता अन्य तालुक्यातून चव्हाण यांना चांगले मतदान झाल्याचा दावा कार्यकर्ते करीत आहेत.
लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व उस्मानाबाद या जिल्ह्य़ात दानवे यांनी यंत्रणा का लावली नाही, असा सवालही केला जात आहे. औरंगाबाद शहरावरच लक्ष केंद्रित केल्याने अन्य जिल्ह्य़ात यंत्रणा व्यवस्थित लावली गेली नाही. काही मतदान केंद्रांवर निवडणूक प्रतिनिधीही उपलब्ध नव्हते, अशी माहिती कार्यकर्तचे देत आहेत.
दानवे यांची प्रतिक्रिया
दानवे यांनाच या बाबत विचारले असता ‘मुंडे यांच्या निधनानंतर मते मागायला जाण्याची कोणाचीच हिंमत होत नव्हती. आमचा नेता गेला होता. त्यामुळे बीडमध्ये तर कार्यकर्त्यांला मत देण्याची विनंती करणेही अवघड झाले होते. दु:ख वाटून घेण्यातच वेळ गेला. वैयक्तिक पातळीवर नांदेड, लातूर, जालना व औरंगाबाद येथे बैठका घेतल्या. पण वेळ खूप कमी मिळाला. त्यामुळे या निवडणुकीत पराभव झाला,’ असे ते म्हणाले. अवैध ठरलेल्या मतदानामुळेही पदवीधरांच्या क्षमतांवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.