राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झाले. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा करण्यात येत होता. अखेर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून, शिवसेनेनं ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत मैदान मारलं आहे. भाजपा दुसऱ्या क्रमांकावर असून, काँग्रेसच्या जागांपेक्षा विजयी झालेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त आहे. राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर किंवा पक्षांच्या चिन्हावर लढविल्या जात नाहीत. परिणामी सर्वच राजकीय पक्षांकडून सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला जातो व या वेळीही तसाच दावा सर्वपक्षीयांनी केला होता. १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा भाजपा व महाविकास आघाडीतील पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. अखेर निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. आणखी वाचा- “नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही”; शिवसेनेचा भाजपाला इशारा १२,७११ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेनं ३ हजार ११३ जागां जिंकल्या असून, सर्वाधिक जागा जिंकणारा पहिल्या क्रमाकाचा पक्ष ठरला आहे. भाजपानं २ हजार ६३२ जागा जिंकल्या असून, दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी २४०० जागांसह तिसऱ्या क्रमाकावर आहे. काँग्रेसनंही राज्यात १८२३ जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ३६ जागी विजय मिळविला आहे. तर २ हजार ३४४ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी झालेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या काँग्रेसच्या जागापेक्षा अधिक आहे. आणखी वाचा- ग्रामपंचायत निकाल: लातूरमध्ये आम आदमी पक्षाचा विजय; केजरीवालांचं थेट मराठीत ट्विट विदर्भात काँग्रेस व भाजप या दोघांनाही यश मिळाले. मराठवाडय़ात महाविकास आघाडीचा वरचष्मा राहिला. कोकणात रत्नागिरीमध्ये शिवसेना तर सिंधुदुर्गमध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा प्रभाव पाहायला मिळाला. उत्तर महाराष्ट्रात राजकीय पक्षांना संमिश्र यश मिळाले. नव्याने निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच निवडला जाईल. सरपंचपदाचे आरक्षणही अद्याप जाहीर झालेले नाही. यामुळे प्रत्येकाने सरपंचपद मिळविण्याच्या उद्देशाने ताकद लावली होती. निकालानंतर सरपंचपदांच्या आरक्षणाची सोडत काढली जाईल. ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर होताच सर्वच नेतेमंडळींनी सरपंचपद आपल्या गटाला मिळावे म्हणून जुळवाजुळव सुरू केली. विशेषत: बहुमत नसलेल्या ग्रामपंचायतींमध्ये नव्या सदस्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.