हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातल्या आखाडा बाळापूर येथे घराच्या जागेत वाटा मिळत नसल्याने नातवाने आजोबाच्या डोक्यात वीट घालून त्यांचा खून केल्याची धक्कादायक  घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दत्ता धनवे याला अटक केली. विठ्ठल धनवे असे या आजोबांचे नाव आहे.

आखाडा बाळापूर या ठिकाणी विठ्ठल धनवे हे त्यांच्या नवनाथ नावाच्या मुलासोबत राहात होते. त्यांचा दुसरा मुलगा रामचंद्र धनवे हा त्याच्या पत्नी आणि मुलासह हनुमान गर भागात भाड्याच्या घरात राहतात. रामचंद्र धनवे आणि विठ्ठल धनवे यांच्यात घराच्या वाटणीवरून वाद होता. विठ्ठल धनवे नवनाथ धनवे सोबत त्यांच्या मालकीच्या घरात रहात होते. नवनाथ धनवे मागील महिन्याभरापासून हळद काढण्याच्या निमित्ताने एक महिन्यापासून बाहेरगावी कामावर गेला. गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास विठ्ठल धनवे यांचा नातू दत्ता धनवे हा आजोबांकडे गेला होता.

दत्ता धनवे हा रामचंद्र धनवे यांचा मुलगा आहे. त्याचा गुरुवारी आजोबांसोबत घराच्या वाटणीवरून वाद झाला. दोघांचे भांडण विकोपाला गेले, ते सोडवण्यासाठी विठ्ठल धनवे यांची पत्नी म्हणजेच दत्ताची आजी कौशल्याबाई मधे पडली. मात्र संतापलेल्या दत्ताने आजीचे काहीही ऐकले नाही. आजोबा विठ्ठल धनवे यांच्या डोक्यात विटांचा मारा केला. त्यात विठ्ठल धनवे जखमी झाले. तर आजी कौशल्या धनवेही किरकोळ जखमी झाली. नातवाने आजोबांना केलेली ही मारहाण एवढी जबरदस्त होती की आजोबांचा जागीच मृत्यू झाला.  घडलेल्या घटनेची माहिती वार्‍यासोबतच गावभर पसरली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.

याप्रकरणी रात्री उशिरा आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात मयताची पत्नी कौशल्याबाई विठ्ठल धनवे यांनी सदर घटनेसंदर्भात लेखी तक्रार दिली. पोनी व्यंकट केंद्रे आपल्या सहकार्‍यासह तात्काळ घटनास्थळी पोचले. आरोपी दत्ता रामचंद्र धनवे यास अटक करून त्याच्या विरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास सुरू आहे.