जनसंघर्ष यात्रेतही गटबाजीचे पडसाद

सांगली : जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याच्या तयारीने काँग्रेसने जनसंघर्ष यात्रा कोल्हापुरातून सुरू केली. जतमध्ये झालेल्या सभेमध्ये प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी भाजपा म्हणजे राज्याला लागलेला कर्करोग आहे असे सांगितले, मात्र, जिल्ह्य़ातील काँग्रेसअंतर्गत गटबाजीच्या कर्करोगावर इलाज कोण करणार आणि दिलेले औषध पचविले जाणार का?  या गटबाजीच्या रोगामुळेच एकेक सत्तास्थाने भाजपाच्या हाती गेली. कृष्णाकाठी कमळ उगवले, फुलले आणि आता बहरलेदेखील !

तोंडावर आलेल्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने काढलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या स्वागतासाठी आणि वातावरण निर्मितीसाठी करण्यात आलेल्या जाहिरातबाजीमध्ये आपल्या गटाचे वर्चस्व कसे राहील याची जाणीवपूर्वक व्यूहरचना करण्यात आली.

सांगली तसा काँग्रेसचा बालेकिल्ला. अगदी गल्ली ते दिल्ली अशी सारी सत्तास्थाने काँग्रेसच्या ताब्यात होती. महापालिका हे एकमेव सत्तास्थान काँग्रेसकडे होते. महापालिका  निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे आत्मपरीक्षण करण्याऐवजी स्वतचा गट कसा अधिक प्रबळ आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न या यात्रेनिमित्ताने करण्यात आला.

जिल्ह्य़ात वसंतदादा आणि राजारामबापू या दोन नेत्यांमधील राजकीय संघर्ष नवीन नाही. मात्र, या संघर्षांत जनतेची कामे होत होती. राजारामबापूंच्या निधनानंतर वसंतदादांनी या राजकीय संघर्षांला पूर्णविराम देत नव्या दमाच्या लोकांना संधी देत समाजकारणाबरोबरच राजकारणही सुरू ठेवले. मात्र, यानंतरच्या वारसदारांनी समाजकारण वगळून राजकीय मांडणीला महत्त्व दिल्याने हा संघर्ष कायम राहील याची दक्षता घेतली. दादा घराण्यातील भाऊबंदकीची किनारही आता या संघर्षांला लाभली आहे. मदन पाटील, पतंगराव कदम यांच्या निधनानंतर काँग्रेसअंतर्गत सुरू असलेल्या वर्चस्वाच्या लढाईमध्ये दादांचा रक्ताचा वारसदार म्हणून विशाल पाटील मदानात येण्याच्या तयारीत आहेत. पक्षाची उमेदवारी मिळण्याअगोदर त्यांना घरच्याच मदानावर चितपट करण्यासाठी काही आडाखे बांधले जात आहेत. मदन पाटील यांनी सांगलीवर आपले वर्चस्व राखले होते. त्यांचा स्वतचा एक गट शक्तिशाली होता. मात्र, त्यांच्या पश्चात ही ताकद कमी झाली असून ही रिक्त झालेली पोकळी कदम गट भरून काढण्याच्या तयारीत आहे. सांगलीतून मदन पाटील यांच्या वारसदार म्हणून जयश्री पाटील यांचे नाव पुढे आणले जात आहे. कदम आणि श्रीमती पाटील यांच्यातील निर्माण झालेले नातेसंबंध यासाठी पाया ठरणार आहेत.

लोकसभेसाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार असे गृहीत धरून दादा घराण्याची वाटचाल सुरू असून केवळ खासदारकी नव्हे तर आमदारकीही आपल्याच घरात हवी अशी व्यूहरचना सध्या केली जात आहे. मात्र, कदम गटाकडून खासदारकीच्या निवडणुकीमध्ये ढवळाढवळ न करता योग्य ते उत्तर देण्याची तयारी या जनसंघर्ष यात्रेतील हालचाली निदर्शक ठरत आहेत.

आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेसचे चेहरे कोणते असतील याची झलक या निमित्ताने जनतेसमोर आली. जतमध्ये डॉ. कदम यांचे नातलग आणि जिल्हा बँकेचे संचालक विक्रमसिंह यादव हे काँग्रेसचे उमेदवार असतील असे प्रदेशाध्यक्ष  चव्हाण यांनी जाहीरही करून टाकले. याचबरोबर भाजपाच्या वाटेवर असलेल्या विटय़ातील नाराज सदाशिवराव पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. जतच्या बदल्यात मिरजेतील जागा राष्ट्रवादीला देण्याची मानसिकता काँग्रेसची आहे, मात्र, राष्ट्रवादी याला राजी होते का हाही प्रश्नच आहे.