यंदाच्या पूर परिस्थितीचा फटका जिल्ह्यातील अनेक गावांना व शहरातील काही भागाला बसून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भविष्यात पुरामुळे नागरिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी पूरबाधित सर्व नागरिकांचे येत्या तीन वर्षात शासकीय जमिनीवर पुनर्वसन करण्यात येईल. यावर्षी ३० टक्के, पुढील वर्षी ३० टक्के व त्यापुढील वर्षी उर्वरित सर्व नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी दिली.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, पूरपरिस्थितीमध्ये प्रशासनाने बाधित नागरिकांचे जलदगतीने स्थलांतर केल्यामुळे जीवितहानी टाळता आली. अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे आणि भूस्खलनामुळे नुकसान होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. ओढ्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. पूरबाधित गावातील नागरिकांचे गतीने पूनर्वसन करण्यावर भर देणार असून यासाठी नागरिकांचेही सहकार्य गरजेचे आहे. भूस्खलनाचा धोका असणाऱ्या नागरिकांची गायरान जमिनीवर तात्काळ तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. आमदार प्रकाश आबीटकर म्हणाले, नद्यांप्रमाणे ओढ्याची पुररेषा निश्चित करणे आवश्यक आहे. डोंगराळ भागात भौगोलिक परिस्थितीनुसार कायमस्वरुपी उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. पालकमंत्री पाटील यांनी भुदरगड, आजरा तालुक्यातील पूरबाधित गावांची पाहणी केली.

भुदरगड तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करुन गारगोटी प्रशासकीय इमारतीमध्ये पालकमंत्री पाटील यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीस आमदार प्रकाश आबीटकर, माजी आमदार के.पी.पाटील,उपविभागीय अधिकारी संपत खिलारी, तहसीलदार अश्विनी अडसूळ, पूरबाधित नागरिक उपस्थित होते.