गेल्या काही दिवसांपासून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या सातत्याने आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करत आहेत. आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेतही अशाच प्रकारचा आरोप करत आपण लवकरच मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघडकीस आणू असा इशारा सोमय्या यांनी दिला होता. त्यांच्या आरोपांना प्रत्युतर देत हसन मुश्रीफ यांनी आता काही खुलासे केले आहेत. हे आरोप म्हणजे भाजपाचं कारस्थान असून त्यामागचा मास्टरमाईंड हे चंद्रकांत पाटील आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

आपल्या पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले,” किरीट सोमय्या जे आरोप करत आहेत, त्यामागे भारतीय जनता पार्टीचं फार मोठं षडयंत्र आहे. आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे याचे खरे मास्टरमाईंड आहेत. मी अनेक वेळा माध्यमांसमोर येऊन बोललो आहे, आवाज उठवला आहे आणि यामुळे भाजपाचे नेते मला कसं थांबवता येईल, दाबता येईल याचा प्रयत्न करत होते. किरीट सोमय्या यांचा वापर त्यांनी फक्त टूल म्हणून केलेला आहे. चंद्रकांत पाटलांना सातत्याने चिंता वाटते की आपण प्रदेशाध्यक्ष आहोत त्या जिल्ह्यामध्ये भाजपा भुईसपाट झालेला आहे. हा कोणी भुईसपाट केला? तर हसन मुश्रीफ याला कारणीभूत आहेत. म्हणून त्यांनी गेल्यावेळेला मला भारतीय जनता पार्टीत येण्याची सुद्धा विनंती केली होती. मात्र पवार एके पवार म्हणत मी ती विनंती मान्य केली नाही”.

हेही वाचा – किरीट सोमय्या फक्त साधन, खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच; हसन मुश्रीफांचा आरोप

ते पुढे म्हणाले,  “त्यानंतर माझ्यावर त्यांनी इनकम टॅक्सची धाड घातली. निवडणुकीपूर्वीच त्यांनी हे कारस्थान केलं आणि आता त्यांना वाटतंय की महाविकास आघाडी जिल्ह्यात इतकी प्रबळ झाली आहे, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात की दहा वर्षांत भाजपाला कोणतंही यश त्यांच्यासमोर दिसत नाहीये. आज कोल्हापूर जिल्ह्यात ते झिरो आहेत. काहीही त्यांच्या ताब्यात नाही. दिल्लीत चंद्रकांत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्याची चर्चा सुरू होती. मात्र अमित शाह यांच्या मैत्रीमुळे ते बचावले. त्यांचा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात होत असलेला सुपडा साफ हे त्यांचं अपयशाचं कारण आहे आणि मग हसन मुश्रीफला कसं थांबवता येईल यासाठी हे कारस्थान सुरू आहे”.

कायदा व सुव्यवस्थेच्या कारणासाठी कोल्हापूर दौरा रद्द केल्याने संतापलेल्या किरीट सोमय्या यांनी कराड इथं पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या पुढच्या कामाची दिशा सांगितली. यावेळी लवकरच मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा बाहेर काढणार तसंच याविरोधात ईडीकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, हसन मुश्रीफ यांचे जावई हे ब्रिक्स इंडिया लिमिटेड या कंपनीचे बेनामी मालक आहेत. ही कंपनी आणि सरसेनापती कारखान्यामध्ये ५० कोटीची आर्थिक उलाढाल झाली आहे. या कंपनीत आलेले पैसे अपारदर्शक पद्धतीने आले आहेत. या व्यवहाराबद्दल काहीही माहिती नाही. एकूण १०० कोटींचा हा घोटाळा आहे. सोमय्या यांच्या याच आरोपांना प्रत्युत्तर देत हसन मुश्रीफ यांनी जोरदार टीका केली आहे.