अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन या दोघींनाही करोनाची लागण झाल्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीदेखील ट्विट करुन माहिती दिली होती. मात्र काही वेळातच त्यांनी ते ट्विट डिलीट केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. ऐश्वर्या आणि आराध्या यांची करोना चाचणी खरंच पॉझिटिव्ह आली की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांची करोना चाचणी घेण्यात आली होती. त्यात अभिषेकचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र आता त्याच्या पाठोपाठ ऐश्वर्या आणि आराध्या या दोघींनाही करोनाची लागण झाल्याची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे.

“ऐश्वर्या राय-बच्चन आणि त्यांची लेक आराध्या अभिषेक बच्चन या दोघींचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसंच जया बच्चन यांची चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे. बच्चन कुटुंबातील सदस्य लवकरच बरे होवोत, ही सदिच्छा”, असं ट्विट राजेश टोपे यांनी केलं होतं. मात्र काही क्षणातच त्यांनी ते डिलीट केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ऐश्वर्या आणि आराध्या यांच्या रिपोर्ट्सचं नेमकं सत्य काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या पाठोपाठ ऐश्वर्या आणि आराध्यालादेखील करोनाची लागण झाल्याची जोरदार चर्चा सुरु झाल्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.