सोशल डिस्टंसिंग मेंटेन करणं आवश्यक आहे. लोकांनी गर्दी करू नये अशी विनंती केली जात आहे. जनतेनं असं होऊ देऊ नये, तरीही कोणी न ऐकल्यास त्यांच्यावर नाईलाजानं कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यापुढे सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देणार, असल्याचंही ते म्हणाले.

लोकांनी रक्तदान करावं. राज्यात केवळ १०-१५ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आहे. फक्त रक्त देण्याच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. जो रक्ताचा साठा कमी झाला आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करावा, असं टोपे यावेळी म्हणाले. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती पावलं उचचली जात आहेत. पोलीस आणि अन्य विभाग काम करतायत. आकडा वाढला असला तरी घाबरण्याचं कारण नाही. अधीच्या लोकांना डिस्चार्ज करण्याची किंवा मॉनिटरींग करण्याची कार्यवाही करण्यात येईल. ८९ जणांपैकी मुंबईचा आणि पुण्याचा प्रत्येकी एक जण आयसीयूमध्ये आहे. सरकारला सहकार्य करणं ही काळाची गरज आहे. वडिलधाऱ्यांची आणि आजारी लोकांची काळजी करावी, ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल त्यांनी अधिकची काळजी घ्यावी, असं मत आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.

आमचं संपूर्ण लक्ष चाचणी केंद्र वाढवण्यावर आहे. सध्या सहा चाचणी केंद्र सुरू आहेत. पूर्ण क्षमतेने ते चालावे याकडे लक्ष आहे. मेडिकल कॉलेजचे डायरेक्टर डॉ. तात्याराव लहाने यांच्याशीही संपर्क झाला. खासगी ठिकाणीही चाचणी केंद्र सुरू करण्यावर विचार सुरू आहे. सध्या आपण राज्याच्या काही सीमा आपण सील करत आहोत. पोलिसांना तसं सांगण्यात आलं आहे. सध्या गोवा सीमा सील करण्यात आली आहे, असंही ते म्हणाले.

जनतेनं जमावबंदीचे आदेशाचं पालन करावं, कोणत्याही परिस्थितीत सर्वांच्या आरोग्यासाठी हे करणं आवश्यक आहे. लोकांनी न ऐकल्यास कारवाई करावी लागेल. पोलिसांना आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.