करोनाचे संकट टाळण्यासाठी तीन मीटरचे अंतर राखा असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. राजेश टोपे यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या संदर्भातला व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. याच व्हिडीओद्वारे त्यांनी हे आवाहन केलं आहे. मी गर्दीच्या ठिकाणी जाणार नाही, मीच माझा रक्षक, मी घरात थांबणार आणि करोनाला हरवणार हे प्रत्येकाने जपले तर आपण करोना विरोधातली लढाई जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी आपण सर्वांनी तीन मीटरचे सुरक्षित अंतर ठेवूया,मी गर्दी करणार नाही,मी गर्दीच्या ठिकाणी जाणार नाही,मीच माझा रक्षक, मी घरी थांबणार..मी कोरोनाला हरवणार..! आपण सर्व कोरोना विरुद्धची लढाई जिंकू या..!#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक pic.twitter.com/ECfP7fxlTo — Rajesh Tope (@rajeshtope11) April 7, 2020 काय म्हणाले आहेत राजेश टोपे? "करोना हा जो व्हायरस आहे त्याविरोधात लढण्यासाठी एकच मंत्र आहे तो म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. प्रत्येकाने किमान तीन मीटरचे अंतर पाळावे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. गर्दी न करणं, गर्दीत जाणं टाळणं. या सगळ्या माध्यमातून सरकारला सहकार्य करा अशी विनंती मी करतो आहे. जिल्ह्यांमधल्या सगळ्या बाबींकडे माझं काळजीपूर्वक लक्ष आहे. मधल्या काळात APMC सुरु करावेत यासाठीचे प्रयत्न केले. मात्र खरेदी करणारे तिथे येत नाही अशी माहिती मिळाली. कापूस अनेकांकडे बाकी आहे. इतरही उत्पादनं आहेत याची मला कल्पना आहे. त्यावर योग्य ती उपाययोजना केला जाईल. तूर्तास मी घरी थांबणार आणि करोनाला हरवणार असा मंत्र प्रत्येकाने जपायला हवा" आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हे आवाहन केलं आहे. महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण ८६८ रुग्ण आहेत. त्यातले ४९० रुग्ण हे मुंबईत आहेत. त्यामुळे खबरदारीचे सगळे उपाय योजले जात आहेत. करोनाग्रस्तांची संख्या ही महाराष्ट्रात आणि देशभरात वाढते आहे. सरकारने केलेल्या आवाहनाचे काटेकोर पालन केले पाहिजे असे आवाहन वारंवार केले जाते आहे.