सोमवारी सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पेण परिसराला झोडपून काढले आहे. अतिवृष्टीमुळे भोगावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पेण शहरालगत असलेल्या सखल भागात पुराचे पाणी शिरले आहे. मुंबई-गोवा महामार्गाला जोडणाऱ्या पेण- खोपोली बायपास मार्गावरही पुराचे पाणी आले आहे. सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा पेण परीसराला चांगलाच तडाखा बसला. सकाळी आठ ते संध्याकाळी सहा या कालावधीत पेण परिसरात १६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. दिवसभर सुरु असलेल्या संततधार पावसामुळे भोगावती नदीने संध्याकाळी धोक्याची पातळी ओलांडली. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन हेटवणे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. त्यामुळे पेण शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरण्यास सुरवात झाली. शहरातील चिचंपाडा, उत्कर्ष नगर, आरटीओ ऑफीस परिसर, म्हाडा कॉलनी येथील सखल भागात पुराचे पाणी शिरले होते. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे लोकांची तारांबळ उडाली. २००५ नंतर पेण शहराला पहिल्याच पूर परिस्थितीला सामोर जावे लागले. दरम्यान येत्या ७२ तासांत उत्तर कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात सकाळपासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत.