दीर्घ प्रतीक्षेनंतर शुक्रवारी नगर शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. सायंकाळनंतर सुरू झालेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण केला होता. रात्री उशिरापर्यंत पावसाचा वेग कायम होता. अचानक झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच धावपळ केली. अगदी सुरुवातीच्या पावसानंतर आत्ताच नागरिकांना जोरदार पर्जन्यवृष्टीचा अनुभव मिळाला.
पावसाचे मागचे दोन महिने कोरडेठाक गेले. शेतकरीही हवालदिल  झालेला आहे. खरिपाचे पीक हातचे गेले. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चा-याचा प्रश्न बिकट झाला आहे. अशातच जोरदार पाऊस झाल्याने, त्याचा कितपत उपयोग होणार, याची चर्चा होत आहे. आज दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत होता. उन्हाळ्यासारखे कडक उन्हे जाणवत होती. सायंकाळनंतर मात्र काळे ढग जमा झाले. साडेसातच्या सुमारास जोरदार पाऊस कोसळू लागला.
रस्त्यावरील नागरिक, पथारीवाल्यांची चांगलीच धावपळ उडाली. तासाभरातच शहरातील रस्ते जलमय झाले. हवेतील उकाडा एकदम कमी झाला. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात काही दिवस झालेला पाऊसही आजच्या इतका जोराचा नव्हता, याची नागरिक  आठवण काढत होते.