विदर्भ आणि मराठवाडय़ावर रुसलेल्या पावसाने मध्य महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. आतापर्यंत या ठिकाणच्या चार जिल्ह्य़ांमध्ये सरासरीपेक्षा ४० टक्के अधिक पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्राप्रमाणे कोकणातही पावसाचा प्रभाव वाढणार आहे. या वर्षी राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने दडी मारली. मात्र मध्य महाराष्ट्रात अनेकदा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे एकीकडे इतर जिल्ह्य़ांमध्ये सरासरीपेक्षा तीस ते चाळीस टक्के पाऊस कमी झालेला असतानाच नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर येथील सरासरी मात्र १४० टक्क्यांहून जास्त झाली. त्यातच आता पुन्हा एकदा पावसाने मध्य महाराष्ट्राला झोडपण्याचे ठरवले आहे. गुरुवारपासून राज्याच्या दक्षिणेला ढगांचा मोठा पट्टा आल्याने उस्मानाबाद, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्य़ांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. शुक्रवारीही यामुळे राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पडला. शनिवारी व रविवारीही मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंतच्या नोंदींनुसार विदर्भ व मराठवाडय़ातील बहुतांश जिल्ह्य़ांमध्ये पावसाचे प्रमाण अवघे ६० ते ७० टक्के आहे. मध्य महाराष्ट्रातील वरील चार जिल्ह्य़ांसोबत पालघर व ठाणे या ठिकाणी सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली या भागांत मात्र अनुक्रमे ७१ टक्के व ५९ टक्के एवढाच पाऊस झाला. अतिवृष्टीचा इशारा पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. गुरुवारपासून राज्याच्या दक्षिणेला ढगांचा मोठा पट्टा आल्याने उस्मानाबाद, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्य़ांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. शुक्रवारीही यामुळे राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पडला. शनिवारी व रविवारीही मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला झोडपले मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला काल रात्रीपासून जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. अनेक जिल्ह्य़ात काल रात्री सुरू झालेला हा पाऊस आज सकाळपर्यंत सुरू होता. या पावसामुळे जलसाठय़ात वाढ झाली असली तरी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडय़ातील जालन्याजवळ रेल्वे मार्गावर पाणी आले तर सांगली जिल्ह्य़ात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हय़ात गुरुवारी रात्री उशिरा दमदार पावसाला प्रारंभ होऊन रात्रभर पाऊस पडत राहिला. उजनी धरण भरले आहे. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्य़ातही गुरुवारी सायंकाळपासून शुक्रवार पहाटेपर्यंत जोरदार पाऊस पडला. या पावसाने शहरातील अनेक सखल भागात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. कृष्णा, कोयना आणि पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.